वांद्रे येथील महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या (एमटीएनएल) इमारतीला भीषण आग लागली आहे. दरम्यान, अग्निशामन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या इमारतीत १०० लोक अडकले होते यांपैकी ६० पेक्षा अधिक लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी ३ वाजून ११ मिनिटांनी या ९ मजली इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली. लेवल ४ ची आग असल्याचे अग्निशमन कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. इमारतीतून बाहेर पडण्यासाठीचे मार्ग बंद झाल्याने आणि मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने इमारतीत १०० लोक अडकून पडले होते. यांपैकी ६० पेक्षा अधिक जणांना वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान, टेरेसवर असलेल्या काही लोकांपर्यंत अग्निशामनची शिडी पोहोचली असून त्यांनाही सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, बचाव कार्य सुरु करण्यात आले असून या मोहिमेदरम्यान अग्निशामन दलाकडून नवे रोबोटिक तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे.

इमारतीत अडकलेल्या काही कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार, आठव्या नवव्या मजल्यावर अनेक लोक अडकून पडले आहे. तर मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण झाल्याने त्यापासून वाचण्यासाठी काही जण टेरेसवर गेले आहेत. एसीच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, दुपारी ३ वाजून ८ मिनिटांनी वांद्रे पश्चिमेकडील टेलिफोन एक्स्चेंजला ही आग लागली. सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर आता घटनास्थळाचा आढावा घेण्यासाठी मी निघालोय. पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १०० लोक या इमारतीत अडकले होते. यांपैकी बहुतेक जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.