चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. दारुबंदीनंतर उठविल्यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दीक युद्ध सुरू आहे. दारूबंदी उठवण्याला अनेक सामाजिक संघटनांचा विरोध देखील होता. मात्र, दारुबंदीनंतर अवैध दारू विक्री आणि त्याअनुषंगाने गुन्हेगारी घटना वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान दारुबंदी उठविल्यानंतर आता राजकीय जुगलबंदी पहायला मिळत आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा जुना व्हिडीओ ट्विट करत जाब विचारला आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या, “क्या हुआ तेरा वादा….जयंतराव जी सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटला यवतमाळला दारूबंदी करणार, इस आश्वासन का… यवतमाळ राहिलं दूर पण चंद्रपुरची दारूबंदी उठवली तुमच्या सरकारने महिलांना कमी समजू नका अजूनही आमच्या भावनांशी असचं खेळत राहिलात तर तुम्हाला घरी बसून चूल फुंकायची वेळ येईल”

जयंत पाटील व्हिडीओमध्ये यवतमाळ मध्ये दारूबंदी करू, असे आश्वासन देत आहेत. आमचं सरकार आल्यावर पहील्या कॅबिनेटमध्ये यवतमाळ दारूबंदी करण्याचे पहीलं काम आम्ही करू, चंद्रपुरात दारूबंदी होते. तर यवतमाळ मध्ये को होत नाही, असा प्रश्न देखील जयंत पाटील यांनी व्हिडीओमध्ये उपस्थित केला आहे.

चंद्रपुरात होती २०१५ पासून दारूबंदी!

गेल्या ६ वर्षांपासून म्हणजेच २०१५ सालापासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी लागू आहे. मात्र, ही दारूबंदी उठवण्यात यावी, अशी मागणी करणारी तब्बल अडीच लाख निवेदने सरकार दरबारी पाठवण्यात आली आहे. तर दारूबंदी कायम ठेवावी, यासाठी ३० हजार निवेदनं आल्याचं सरकारी आकडेवारी सांगते. यामध्ये दारूबंदी का उठवली जावी, या कारणांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

गुन्हेगारीत झाली होती वाढ

दारुबंदीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीत वाढ झाली. दारूबंदीपूर्वी म्हणजे २०१०-२०१४ या काळात १६ हजार १३२ गुन्हे दाखल झाले होते. दारूबंदीनंतर म्हणजे २०१५-२०१९ या काळात ४० हजार ३८१ गुन्हे दाखल करण्यात आले. दारूबंदीपूर्वी एक हजार ७२९ महिला गुन्हेगारीची प्रकरणे होती. दारूबंदीमध्ये ४०४२ महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर बालकांचा अवैध दारूसाठी वापर करण्याची संख्याही वाढली.

आणखी वाचा – “भगिनींनो कंबर खोचून उभ्या राहा, या सरकारने पुन्हा…”, दारुबंदीवरून चित्रा वाघ संतापल्या!

सरकारने आपल्या अकार्यक्षमतेची कबुलीच दिली

तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमध्ये दारूबंदी लागू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. अनेक ग्रामपंचायती, महिला संघटना, बचतगट आदींनी दारूबंदीसाठी ठराव केले होते. दारूच्या व्यसनामुळे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त होत होते, तरुण पिढीही दारूच्या आहारी जात होती. त्यामुळे डॉ. बंग, पारोमिता गोस्वामी यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी दारूबंदीसाठी प्रयत्न केले होते आणि  बंदी उठविण्यास ठाम विरोध केला होता.

चंद्रपूरमधील दारूबंदी ही तेथील शेकडो ग्रामपंचायतींनी केलेले ठराव, हजारो महिलांचा मोर्चा ही लोकभावना लक्षात घेऊन के ली होती. अवैध दारूविक्री व त्याबाबतचे गुन्हे वाढत असल्याने दारूबंदी रद्द करत असल्याचे सांगत महाविकास आघाडी सरकारने आपल्या अकार्यक्षमतेची कबुलीच दिली आहे, असे चंद्रपूरचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.