शिवसेना आणि भाजपा यांची युती शिवसेनेच्या १५१ जागांच्या हट्टामुळे तुटली. २०१४ मध्ये ती युती झाली असती तर कदाचित महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत विराजमान झाले असते अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. एका कार्यक्रमात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांना युती का तुटली असा प्रश्न विचारला त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निर्णय तुम्हाला कळतात का? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी नाही असे म्हटले. मग असे असतानाच तुम्ही युती होणारच असे तुम्ही ठाम पणे कसे सांगू शकता असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना राऊत यांनी विचारला, त्यावर  शिवसेना हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पक्ष आहे. या देशातले तथाकथित सेक्युलर एकत्र होतील. तेव्हा या देशातील हिंदुत्त्ववाद्यांना एकत्र यावेच लागेल असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. संजय राऊत यांनी मुलाखतीच्या सुरुवातीलाच ही मॅच फिक्स नाही असे सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही हा सामना नाही असे म्हटले आहे. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. आताही भाजपा आणि शिवसेनेची युती होईल कारण तुमच्या मनात काय आकडा आहे ते आम्हाला माहित आहे असेही फडणवीस यांनी म्हटले.

तुमच्या सत्तेचा रिमोट कोणाकडे आहे? असे संजय राऊत यांनी विचारताच बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांच्या हाती रिमोट द्यायला आवडला असता पण आता आमच्या पक्षात कोणताही रिमोट कंट्रोल नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह हे आमच्या निर्णयांमध्ये लक्ष घालत नाहीत असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.