बुलेट ट्रेनची सुरुवात होणाऱ्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जागेत मेट्रोची कारशेड उभारण्यासाठी चाचपणी सुरू झाली असतानाच, केंद्र सरकारच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या डहाणूजवळील वाढवण बंदराला राज्य सरकारकडून सहकार्य मिळण्याची शक्यता कमीच दिसत आहे. यावरून आता राज्य व केंद्र सरकारमध्ये नवा वाद होण्याची चिन्हं आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

“खारे पाणी गोडे करण्याचा प्रस्ताव आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही म्हणून ठाण्यात रद्द झाला. मग,असा प्रकल्प २०० पट अधिक खर्च करुन मुंबईला तरी कसा परवडणार? वाढवण बंदर जर समुद्री पर्यावरणाला घातक असेल, तर मुंबईचा प्रकल्पही घातक ठरु शकतो? म्हणून कंत्राटदार प्रेमाची, बालहट्टाची लाट आवरा!.” अशा शब्दांमध्ये शेलार यांनी ट्विट करून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

डहाणूजवळ वाढवण येथे मोठे बंदर उभारण्यात येणार असून, या बंदराला स्थानिक जनता तसेच मच्छीमारांचा विरोध आहे. या बंदराला विरोध करण्याकरिता दोन दिवसांपूर्वी मुंबईपासून पालघपर्यंत मच्छीमारांनी बंदही पाळला होता. बंदर विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी भेट घेतली. या वेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक उपस्थित होते.

वाढवण बंदरावरून राज्याचा विरोधी सूर

या प्रकल्पाबाबत आम्ही स्थानिक जनता व मच्छीमारांच्या बरोबर आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंदर विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिल्याने राज्य सरकार कठोर भूमिका घेणार, असेच संकेत मिळत आहेत.

दरम्यान, ठाणे महापालिकेचा खारे पाणी शुद्ध करून ते गोडे करण्याचा (डिसिलॅनेशन) १५० कोटी खर्चाचा वादग्रस्त प्रकल्प अखेर रद्द झाला आहे. या संदर्भात पार पडलेल्या महासभेत सत्ताधाऱ्यांनी तो अधिक खर्चीक व व्यवहार्य नसल्याचे सांगून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.