महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. पालकांनी विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादीच्या पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी असं ट्विट करत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुजय विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशावर निशाणा साधला आहे.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. या प्रवेशानंतर एक खोचक ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. सर्वांनी विशेषत: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, जनहितार्थ जारी असं हे ट्विट आव्हाडांनी पोस्ट केले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगरच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चर्चा सुरु होती. सुजय विखे पाटील यांच्यासाठी अहमदनगरची जागा मागण्यात आली होती. मात्र सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसला हात दाखवून थेट भाजपात प्रवेश केला. ज्यानंतर आव्हाड यांनी महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाल्याचा ट्विट आव्हाड यांनी केला आहे.