आमदारांचे करोना रिपोर्ट आल्यावर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा अंतिम निर्णय होईल. परंतु आम्ही विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती त्यापेक्षा जास्त मताने जिंकू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहून सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत सुचवलं आहे. निश्चितरुपाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेणं आवश्यक आहे. त्याबाबत तिन्ही पक्षात एकमत आहे. दोन दिवसाचं अधिवेशन असलं तरी याच अधिवेशनात कार्यक्रम करता येईल यावर विचारविनिमय सुरू असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

तो निकाली विषय काढला तर…

दरम्यान, राज्यपाल विधानसभा उपाध्यक्षांना अध्यक्ष पदाची निवडणूक लवकर करा, असे सूचित करत आहेत. मात्र विधानपरिषदेच्या १२ जागा रिक्त आहेत. हा विषय निकाली काढला तर १२ आमदार महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी कामाला लागतील, असा आमचा आग्रह वारंवार राहिला आहे, याची आठवणही नवाब मलिक यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना एकदा करुन दिली.

हेही वाचा- सर्व विरोधकांना एकत्र आणणं हाच शरद पवारांचा अजेंडा- नवाब मलिक

विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेऊच पण त्याअगोदर १२ आमदार नियुक्तीचे प्रकरण लवकर निकाली काढा अशी विनंती नवाब मलिक यांनी राज्यपाल यांना केला आहे.

राज्यपाल सध्या कामात आहेत, सवड मिळाल्यावर सही करतील -राजू शेट्टी

विधान परिषदेतील राज्यपालांच्या कोट्यातून नियुक्त केल्या जाणाऱ्या १२ आमदारांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देखील आज साखर आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी १२ आमदारांच्या नियुक्तीबद्दलच्या प्रश्नावर त्यांनी मिश्कील भाष्य केलं. “राज्यपाल सध्या कामात आहे. त्यांना सवड मिळाल्यावर ते सही करतील,” असं सांगत “काल मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत यावर चर्चा झालेली नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.