महाराष्ट्रात १९९० नंतरच्या कालखंडात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे काही समर्थक राजकारणीच कारवाईच्या फेऱ्यात अडकल्याचे दिसतात. छगन भुजबळ यांना आता अटक झाली, परंतु या पूर्वी हितेंद्र ठाकूर, सुरेश ऊर्फ पप्पू कलानी, डॉ. पद्मसिंह पाटील हे तुरुंगाची हवा खाऊन बाहेर आले आहेत. पवार यांचेच एकेकाळचे समर्थक सुरेश जैन सध्या तुरुंगात आहेत.

राज्यात १९९१ च्या दरम्यान, काँग्रेसचे सरकार असताना आणि शरद पवार यांचेच कट्टर समर्थक सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना आमदार असलेल्या हितेंद्र ठाकूर व पप्पू कलानी यांच्यावर दोन वेगवेगळ्या खून प्रकरणांत टाडा कायद्याखाली अटक करण्यात आली होती. पुढे मुंबईतील जातीय दंगल हाताळण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून नाईक यांना मुख्यमंत्रिपदावरून हाटविले गेले.

२००३ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी चार मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांच्यावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी बेमुदत उपोषण केले होते. पद्मसिंह पाटील, विजयकुमार गावित, नवाब मलिक व सुरेश जैन हे ते चार मंत्री राष्ट्रवादीचे आणि अर्थात सर्वच जण शरद पवार यांचे समर्थक होते. न्या. पी. बी. सावंत यांच्या चौकशी आयोगाने दोषी ठरविलेल्या पाटील, मलिक व जैन यांना राजीनामे द्यावे लागले होते.