मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या, मुंबईचा अपमान करणाऱ्या नटीच्या मागे भाजपा उभा राहतो हे दुर्दैवी आहे असं रोखठोक मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडलं आहे. रविवारच्या रोखठोक या सदरात एक खास लेख लिहून त्यांनी कंगना रणौत, भाजपा आणि मागच्या काही दिवसांमध्ये करण्यात आलेल्या वक्तव्यांवर आपल्या खास शैलीत टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले आहेत संजय राऊत?
महाराष्ट्राची राजधानी मुंबईस ग्रहण लावण्याचे प्रयत्न पुन्हा सुरु झाले आहेत. हे ग्रहण उपरे लावत आहे. पण त्यांना बळ देण्यासाठी परंपरेप्रमाणेच आपल्यातलेच घरभेदी सरसावले आहेत. मधल्या काळात मुंबईस पाकिस्तान म्हटले गेले. मुंबईचा अपमान करणाऱ्या एका नटीच्या बेकायदेशीर बांधकामावर मुंबई महापालिकेने कारवाई केली तेव्हा महापालिकेचा उल्लेख बाबर असा करण्यात आला. मुंबईला आधी पाकिस्तान आणि नंतर बाबर म्हणणाऱ्यांमागे भारतीय जनता पक्ष उभा राहतो हे दुर्दैवच म्हणायला हवे. मुंबई विरोधा ६०-६५ वर्षांपूर्वी काँग्रेसच्या काही नेत्यांनी पद्धतशीर कारस्थाने केली. त्या कारस्थानांच्या छाताडावर पाय ठेवून मराठी माणसाने भगवा झेंडा फडकवला. भाजपाचे एक प्रमुख नेते आशिष शेलार यांचे असे म्हणणे आहे की ‘ज्या काँग्रेसने मराठी आंदोलकांवर गोळ्या झाडल्या त्यांच्यासोबत शिवसेना सत्तेत आहे.’ भाजपा नेत्यांचा इतिहास कच्चा आहे.

कंगनावर टीकास्त्र
एक नटी मुंबईत बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याविरुद्ध एकेरी भाषा बोलते. आव्हानाची भाषा करते व त्यावर महाराष्ट्राच्या जनतेने काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही हे कसले एकतर्फी स्वातंत्र्य? तिच्या बेकायदेशीर बांधकामावर हातोडा पडला तेव्हा हे तर माझे राम मंदिरच होते असा कांगावाही तिने केला. पण हे बेकायदेशीर बांधकाम तिने कायद्याचे उल्लंघन करुन ती सांगत असलेल्या पाकिस्तानात बांधले. मुंबईला ‘पाकिस्तान’ म्हणायचे व या ‘पाकिस्ताना’तल्या बेकायदेशीर कामांवर सर्जिक स्ट्राईक केला की छाती पिटायची, हा कसला खेळ?

संपूर्ण नव्हे, निदान अर्ध्या हिंदी सिनेसृष्टीने तरी मुंबईच्या अवमानासंदर्भात व्यक्त व्हायलाच हवे होते. कंगनाचे मत हे संपूर्ण सिनेसृष्टीचे मत नाही, असे सांगायला हवे होते. निदान अक्षय कुमार वगैरे मोठ्या कलावंतांनी तरी समोर यायला हवे होते. मुंबईने त्यांनाही दिलेच आहे. जगभरातील श्रीमंतांची घरे मुंबईत आहेत. मुंबईचा अवमान होत असताना ते सगळेच खाली मान घालून बसतात. मुंबईचे महत्त्व फक्त ओरबडण्यासाठी व पैसे कमावण्यासाठीच आहे. मग मुंबईवर कोणी रोज बलात्कार केला तरी चालेल. या सगळ्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे, ‘ठाकरे’ यांच्या हाती महाराष्ट्राची सूत्रे आहेत. त्यामुळे रस्त्यावर उतरुन अस्मितेसाठी राडे करण्याची आज गरज नाही. महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे भाग्यचक्र मुंबईभोवतीच फिरत आहे. मुंबई देशाची असेल नाहीतर जगाची, पण तिच्यावर पहिला हक्क महाराष्ट्राचा आहे. मुंबई महाराष्ट्राच्या बापाची आहे.