“शरजील उस्मानी हा उत्तर प्रदेशचा असल्याचं मुख्यमंत्री सांगत होते, पण त्या शरजील उस्मानीची हिंदुंच्या विरुद्ध उत्तर प्रदेशात बोलायची हिंमत नाही. तो तुमच्या आमच्या महाराष्ट्रात येतो आणि पुण्यात येऊन बोलून जातो. त्याच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत या सरकारमध्ये नाही, हे या सरकारचं हिंदुत्व ते आम्हाला सांगत होते.” अशा शब्दांमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना शरजील उस्मानीच्या मुद्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज(बुधवार) आपल्या भाषणात भाजपावर अनेक मुद्द्यांवरून निशाणा साधला. राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी भाजपाला शरजील उस्मानीच्या मुद्द्यावरून उत्तर देत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून देखील सुनावलं. तसेच, “शरजील उस्मानीला आम्ही अटक केल्याशिवाय राहणार नाही”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

“शरजील उस्मानी ही उत्तर प्रदेशमधली घाण आहे. आमच्याकडची नाही. विरोधी पक्षनेते म्हणाले होते तो पाताळात गेला तरी आम्ही शोधून काढू. पण मग कधी जाणार? पाताळात नाही, त्याला शोधायला कधी जाणार? उत्तर प्रदेशात नुसतं राम मंदिर बांधून चालणार नाही. पाया ठिसूळ असेल आणि तिथे अशी देशद्रोही पिलावळ असेल आणि तिचं पालनपोषण उत्तर प्रदेशात होत असेल तर उगाच आमच्या अंगावर येऊ नका. शरजील उस्मानीला अटक केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने आम्हाला मदत करावी. पाया ठिसूळ आणि राम मंदिर बांधताय त्याला अर्थ नाही”, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

“काय हे तुमचं हिंदुत्व, काय हे तुमचं दुर्दैव”, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावलं!

आम्हाला हिंदुत्व शिकवायला निघाले हे मोठं आश्चर्य आहे –
तसेच, माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी, “स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात, भारतरत्न नाही मिळाला तरी चालेल पण स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशद्रोही आणि समलैंगिक म्हणणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात. तुमचं सरकार तयार झाल्यानंतर त्यांनी पुस्तक काढलं आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरुद्ध आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्री, आम्हाला हिंदुत्व शिकवायला निघाले हे मोठं आश्चर्य आहे. संभाजीनगरच्या संदर्भात तर अतिशय हास्यास्पद अशाप्रकारचं वक्तव्यं मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.” असं देखील बोलून शिवसेनेवर तोफ डागली.

“चौकातलं भाषण व सभागृहातलं भाषण यातलं अंतर मुख्यमंत्र्यांना लक्षात आलेलं नाही”

मुख्यमंत्र्यांचं भाषण हे केवळ चौकातलं भाषण होतं –
“बरं झालं त्यांनी हे मान्य केलं की शिवसेना ही कुठेही स्वातंत्र्य लढ्यात नव्हती पण त्यांना हे माहिती नसेल, की डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार संघाचे संस्थापक हे स्वातंत्र्यसंग्राम सेनानी होते, स्वातंत्र्य लढ्यात त्याचं योगदान होतं. याची माहिती त्यांनी घेतली नाही. इतिहासाची माहिती नसताना, विनाकारण अशाप्रकारे राजकीय भाषण हे या ठिकाणी केलं. मुख्यमंत्र्यांचं भाषण हे केवळ चौकातलं भाषण होतं, ते निराश करणारं भाषण होतं. एकही मुद्दा ते सांगू शकले नाहीत.”

करोनाकाळात गैरव्यवहारच अधिक!

कोविडच्या भ्रष्टाचाराची पुस्तिका –
“कोविडच्या भ्रष्टाचाराची पुस्तिका अमित साटम यांनी तयार केलेली आहे, आम्ही त्याचं विमोचन करतोय. पण कोविडच्या भ्रष्टाचाराचे जे मुद्दे आम्ही त्या ठिकाणी मांडले. एकाही मुद्द्याला ते उत्तर देऊ शकलेले नाहीत. त्याला पूर्णपणे बगल देण्याचं काम हे मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.म्हणू मला असं वाटतं की एवढं सूमार मुख्यमंत्र्यांचं भाषण महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या प्रस्तावाच्या उत्तरामध्ये यापूर्वी कधीही झालं नसेल, अशा प्रकारचं भाषण त्यांनी या ठिकाणी केलं. खरंम्हणजे पूर्णपणे महाराष्ट्राची निराशा ही त्यांनी केली.”

शरजील उस्मानी एल्गार परिषदेत काय म्हणाला? वाचा संपूर्ण भाषण…

तुमच्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्र बदनाम होतोय आमच्या बोलण्यामुळे नाही –
“जर आम्ही त्यांच्यावर टीक केली तर आम्ही महाराष्ट्रद्रोही, आम्ही जर त्यांचा गैरकारभार दाखवला तर आम्ही महाराष्ट्रद्रोही, आम्ही जर त्यांचा भ्रष्टचार काढला तर आम्ही महाराष्ट्रद्रोही, भ्रष्टाचार काढला तर महाराष्ट्राची बदनामी करू नका, अरे तुमच्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्र बदनाम होतोय आमच्या बोलण्यामुळे नाही. आमच्या बोलण्यामुळे तो भ्रष्टाचार बाहेर आला तर कदाचित महाराष्ट्राची बदनामी वाचेल. जे काही वक्तव्य त्या ठिकाणी केलं आणि म्हणून हे स्पष्टपणे माहिती होतं सत्ता पक्षाला की याच्यावर आम्हाला बोलायची संधी मिळाली, तर त्यांच्या वक्तव्याची चिरफाड होईल, म्हणून त्या ठिकाणी सत्तापक्षाने त्यानंतर अध्यक्षांवर दबाव टाकून आम्हाल बोलू दिलं नाही.पण आमची तोंडं बंद राहणार नाही.”