मुंबई : अकरावीची प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीपासून सुरू असलेल्या तांत्रिक अडचणीचा ससेमिरा गुणवत्ता यादीसाठीही कायम राहिला आहे. शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १० जून रोजी जाहीर होणारी पहिली यादी आता २६ जून रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रवेश प्रक्रियाच लांबणीवर पडणार आहे. यासंदर्भात विद्यार्थी संघटना व पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दरवर्षी अकरावी प्रवेश प्रक्रियेला विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असते. त्यामुळे यंदा शालेय शिक्षण विभागाने इयत्ता १० वीचा निकाल १५ दिवस आधी जाहीर केला. त्यानुसार २१ मेपासून अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली, मात्र तांत्रिक अडचणीमुळे अर्ज नोंदणी प्रक्रिया २६ मे पासून सुरुवात करण्यात आली. त्यानंतरही विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात वारंवार अडचणी येत होत्या. या अडचणींवर मात करत अखेर ७ जून रोजी ऑनलाईन अर्ज नोंदणी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर १० जून रोजी पहिली गुणत्तवा यादी जाहीर करण्यात येणार होती. मात्र तांत्रिक अडचणीचे शुक्लकाष्ठ हे कायम राहिल्याने प्रवेशाचे वेळापत्रक पुन्हा लांबणीवर पडले आहे. शिक्षण संचालनालयाने नव्याने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आता पहिली गुणवत्ता यादी १० जूनऐवजी २६ जून रोजी जाहीर होणार आहे. या सर्व प्रक्रियेतील दिरंगाई व विद्यार्थ्यांना होणाऱ्या मनस्तापाविरोधात विद्यार्थी संघटना व पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दहावीचा निकाल लवकर जाहीर करण्यासाठी यंत्रणांना कामाला लावले. त्यानंतरही अकरावी प्रवेश प्रक्रियेला होणारा विलंब म्हणजे पालक व विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्याची प्रशासनाची कोणतीही तयारी नसताना ही प्रक्रिया राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या माथी मारण्यात आली आहे. यातून विद्यार्थ्यांची सोय होण्याऐवजी गैरसोयच झालेली आहे. तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी वेळ घेतला असला तरी ते पुन्हा रुळावर येईल का याबाबत कोणतीही खात्री नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना होणाऱ्या मनस्तापाची जबाबदारी प्रशासनाने घेऊन विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात यावी. त्यासाठी ‘लाडके विद्यार्थी योजना’ राबविण्यास हरकत नसल्याचे मत शिक्षक समुपदेशक जयवंत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

अकरावी प्रवेश प्रक्रियेचा शालेय शिक्षण विभागाकडून खेळखंडोबा करण्या तआला आहे. १० जून रोजी जाहीर होणारी गुणवत्ता यादी २६ जून म्हणजे तब्बल १६ दिवस पुढे ढकलून विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळ करण्यात आला आहे. शिक्षणामध्ये रोज नवनवे प्रयोग करून सरकारने अस्थिरता निर्माण केली आहे. योग्य नियोजनाअभावी विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घातले आहे. प्रवेश प्रक्रियेत लवकरात लवकर सुधारणा न केल्यास शिक्षण संचालकांना घेराव घालू आणि रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी दिला.

गेल्या वर्षी निकाल उशिरा जाहीर होऊनही पहिली यादी २८ जूनला प्रसिद्ध झाली होती. यातून प्रशासन किती गतिमान आहे, हे दिसून येते. हा लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ असून याबाबत आंदोलनाचे अस्त्र उगारण्यात वरिष्ठांशी चर्चा करून एक-दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे युवासेनेचे नेते प्रदीप सावंत यांनी सांगितले.

अकरावी प्रवेशाचे नवे वेळापत्रक

अंतिम गुणवत्ता यादी व शून्य फेरी वाटप – ११ जून

शून्य फेरी प्रवेश – १२ ते १४ जून

नियमित फेरी १ चे वाटप – १७ जून

नियमित फेरी प्रवेश जाहीर करणे – २६ जून

प्रत्यक्ष महाविद्यालयात प्रवेश घेणे – २७ ते ३ जुलै

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नियमित फेरी २ साठी रिक्त जागांची यादी जाहीर करणे – ५ जुलै