मुंबई : अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना नाव नोंदवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता ५ जून रोजी दुपारी २ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. संस्थात्मक कोट्यातील जागा भरण्यासाठी आवश्यक बदल करण्याचे आदेश शासनाने दिल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी २६ मे पासून शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळावर विद्यार्थी नोंदणी सुरू आहे. मात्र संस्थात्मक कोट्यासंदर्भात ६ मे रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीत काही सुधारणा करण्यात आल्या. त्यानुसार इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये महाविद्यालयातील संस्थात्मक कोट्यातील जागा भरण्यासाठी आवश्यक बदलाबाबत शासनाने काढलेल्या पत्रानुसार आदेश दिले. या बदलाच्या अनुषंगाने संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांच्या संस्थांच्या शाळांचा बदल करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाने केलेल्या बदलाच्या अनुषंगाने इन-हाऊस कोटामधील पसंतीक्रम आवश्यकतेनुसार बदल करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना तसेच पालक, विद्यार्थी यांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी विद्यार्थी नोंदणीसाठीची मुदत ३ जून ऐवजी ५ जून रोजी दुपारी २ पर्यंत करण्यात आली आहे. दरम्यान सोमवारी रात्री आठ वाजेपर्यंत ११ लाख ५ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती शिक्षण संचालक (माध्यमिक) डॉ. श्रीराम पानझाडे यांनी दिली.
११ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी
२ जून रोजी सायंकाळपर्यंत एकूण ११ लाख ५ हजार ३६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यात पुणे विभागातून १ लाख ८७ हजार ९२५, मुंबई विभागातून २ लाख ६५ हजार ९००, कोल्हापूर विभागातून १ लाख ७ हजार १२, छत्रपती संभाजीनगर विभागातून १ लाख ४० हजार, नाशिक विभागातून १ लाख १२ हजार १०८, नागपूर विभागामधून ९५ हजार २१०, अमरावती विभागातून ९८ हजार ३५९, लातूर विभागातून ५८ हजार ५८६ आणि अन्य जिल्ह्यांमध्ये ६१ हजार ७१२ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली असल्याची माहिती डॉ. पानझाडे यांनी दिली आहे.