मुंबई : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रांत कमी पाऊस पडला असून धरणातील पाणीसाठा गेल्यावर्षीच्या तुलनेत निम्मा जमा झाला आहे. सातही धरणांत मिळून सध्या केवळ २९.७२ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ६५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा होता व काही धरणांमध्ये काठोकाठ पाणी भरले होते. यंदा मात्र तलाव भरण्यासाठी अद्याप प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुंबई आणि उपनगरात दररोज थोडोथोडा पाऊस पडत असून धरणक्षेत्रातही पावसाला तितकासा जोर नाही. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणक्षेत्रात केवळ ५० टक्के पाऊसच पडला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठाही गेल्यावर्षीच्या तुलनेत निम्मा आहे. गेल्यावर्षी जुलैच्या मध्यापर्यंत धरणक्षेत्रात २३६४ मिमी पाऊस पडला होता. यंदा मात्र आतापर्यंत केवळ १३४३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणातील पाणीसाठ्यात दररोज वाढ होते आहे. हेही वाचा >>> मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे पाहणीसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा दौरा सूरू पावसाबरोबरच जमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यामुळे पाणीसाठा वाढत आहे. मात्र अजूनही गेल्यावर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमीच आहे. उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सात धरणातून मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. सध्या सातही धरणांमध्ये ३ लाख ३४ हजार ५२९ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा आहे. पुढचे केवळ दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा धरणांमध्ये आहे. दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा १४ जुलै २०२३..४ लाख ३० हजार ०९६ दशलक्षलीटर...२९.७२ टक्के १४ जुलै २०२२..९ लाख ५२ हजार ५५० दशलक्षलीटर... ६५.८१ टक्के १४ जुलै २०२१..२ लाख ५१ हजार ११८ दशलक्षलीटर...१७.३५ टक्के