बेस्ट उपक्रमाच्या कंत्राटी कंपनीच्या ‘सीएनजी’ बसगाड्यांना वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असल्याने फेब्रुवारीत ‘बेस्ट’ने अशा ४१२ बस पूर्णपणे बंद करण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला. त्यामुळे प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रूझ व मजास या चार बस आगारातील सुमारे ३६ बस मार्गांवर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बंद केलेल्या बस पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या आहेत. सध्या बेस्टच्या ताफ्यातील चार आगारातील ३६९ बस पुन्हा सेवेत दाखल झाल्या आहेत. तर, उर्वरित बस आठवड्याभरात धावणार आहेत, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली.

हेही वाचा >>> न्यु दिंडोशी परिसरातील बिबट्या जेरबंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंधेरी रेल्वे स्थानकाच्या परिसरातील आगरकर चौक येथे बेस्ट बस क्रमांक ४१५ या बस गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी घडली. त्यापूर्वी २५ जानेवारी आणि ११ फेब्रुवारी रोजीही बसला आग लागण्याच्या घटना घडल्या. बेस्टला भाडेतत्त्वावर बस पुरवठा करणाऱ्या मातेश्वरी कंपनीच्या सीएनजी बसगाड्यांच्याबाबत ही दुर्घटना घडली. त्यामुळे मातेश्वरीच्या ४१२ बसगाड्यांचे प्रवर्तन तडकाफडकी रोखण्याचा निर्णय २२ फेब्रुवारी रोजी बेस्टने घेतला आहे. वारंवार आग लागण्याच्या घटना का होत आहेत, त्यामागची कारणे शोधण्यासाठी लखनऊ येथून टाटा मोटर्सच्या अभियंत्यांचे पथकाने मुंबईत दाखल झाले. टाटा मोटर्सने हमी दिल्यानंतर मातेश्वरी कंपनीच्या बस प्रवासी सेवेत रस्त्यावर येतील, अशी माहिती बेस्ट उपक्रमाने दिली होती. टाटा मोटर्सच्या पथकाने आगीच्या घटना टाळण्यासाठी बसची तपासणी केली. त्यानंतर, हळूहळू बंद केलेल्या बस पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या. बंद केलेल्या ३६९ बस मंगळवारपासून पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या आहेत. तर, उर्वरित बस आठवडाभरात सुरू होतील. प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रूझ व मजास बस आगारातून मातेश्वरी कंपनीच्या ४१२ बस धावतात. मात्र, सध्या ३६९ बस सुरू झाल्याची माहिती बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.