मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४,६५४ (१४ भूखंडासह) घरांसाठी २१ मार्चपर्यंत अनामत रक्कमेसह ४,७८४  अर्ज सादर झाले आहेत. कोकण मंडळाच्या सोडतीला १३ दिवसांत मिळालेला प्रतिसाद पूर्वीच्या तुलनेत काहीसा कमी आहे.

कोकण मंडळाच्या २,६०६ घरांसाठी ८ मार्चपासून अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली असून ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ योजनेतील २,०४८ घरांसाठी १७ मार्चपासून अर्ज विक्री-स्वीकृती सुरू झाली आहे. ही प्रक्रिया १२ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. आरटीजीएस – एनईएफटीसह अनामत रक्कम भरून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १२ एप्रिल आहे. या घरांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.  ८ ते २१ मार्चदरम्यान ९,७७१ जणांनी अर्ज भरले आहेत. तर अनामत रक्कमेसह केवळ ४,७८४ अर्ज सादर झाले आहेत.

हेही वाचा >>> शीव-ठाणे प्रवास सप्टेंबरपासून वेगवान, छेडा नगर वाहतूक सुधार प्रकल्प; उड्डाणपुलाचे ४५ टक्के काम पूर्ण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोकण मंडळाच्या आतापर्यंतच्या सोडतीतील घरांसाठी लाखोंच्या संख्येने अर्ज येत होते.  ऑक्टोबर २०२१ मध्ये ८,९८४ घरांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीसाठी तब्बल दोन लाख ४६ हजार अर्ज सादर झाले होते. यावेळी मात्र अर्जांची संख्या कमी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अर्ज सादर करण्यासाठी १८ ते २० दिवसांचा कालावधी आहे. नागरिक शेवटच्या क्षणापर्यंत अर्ज भरतात. त्यामुळे प्रतिसाद वाढेल असा विश्वास कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे यांनी व्यक्त केला. सोडतीला १० एप्रिलपर्यंत मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन अर्ज विक्री-स्वीकृतीला मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले. दरम्यान सोडत प्रक्रियेतील बदल नवे निकष आणि आवश्यक कागदपत्रे सोडतीपूर्वीच जमा करण्याच्या अटीमुळे कमी प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा आहे.