मुंबई :  अकरावीच्या पहिल्या केंद्रीय प्रवेश फेरीत मुंबई विभागात ६७ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित केले असून जवळपास १२ हजार विद्यार्थ्यांनी प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आता पुढील नियमित फेऱ्यांमध्ये सामावून घेण्यात येणार नाही.

अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत १ लाख ३९ हजार ६५१ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले होते. त्यापैकी ६७ हजार ९६२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. अद्याप १ लाख ९३ हजार ७८० विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे बंधनकारक असतानाही १२ हजार ४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले नाहीत. यंदा मुंबई महानगरात केंद्रीय फेरीसाठी २ लाख ३२ हजार ६९० जागा उपलब्ध आहेत. पहिल्या फेरीसाठी २ लाख ३७ हजार २६८ विद्यार्थ्यांचे अर्ज वैध ठरले होते. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पुढील फेरीसाठी साधारण १ लाख ६४ हजार जागा उपलब्ध असतील.

दुसरी प्रवेश यादी १२ ऑगस्ट रोजी

अकरावीच्या दुसऱ्या केंद्रीय प्रवेश फेरीसाठी महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम (अर्जाचा दुसरा भाग) रविवारी (७ ऑगस्ट) सकाळी १० वाजल्यापासून मंगळवारी (९ ऑगस्ट) रात्री १० वाजेपर्यंत भरता येणार आहे. महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या जागा, पहिल्या फेरीतील प्रवेश पात्रता गुण (कट ऑफ), मिळालेले  गुण यांची सांगड घालून विद्यार्थ्यांना अर्ज भरायचे आहेत. दुसरी प्रवेश यादी १२ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.

कोटय़ातील प्रवेशाची स्थिती..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई महानगर प्रदेशातील २ हजार ७६ महाविद्यालयात अल्पसंख्याक, संस्थांतर्गत आणि व्यवस्थापन कोटय़ातील मिळून १ लाख ४० हजार ८०५ जागा उपलब्ध आहेत. आतापर्यंत २४ हजार ७८८ विद्यार्थ्यांनी कोटय़ांतर्गत प्रवेश निश्चित केला असून १ लाख १३ हजार ७९७ जागा रिक्त आहेत. आतापर्यंत २ हजार २२० जागा महाविद्यालयांनी केंद्रीय प्रवेश फेरीला समर्पित केल्या आहेत.