इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी लागणाऱ्या साडेबारा एकर जमिनीच्या मोबदल्यात राज्य सरकारतर्फे राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाला (एनटीसी) तब्बल ९७३ कोटी रुपये किमतीचा विकास हस्तांतरण हक्क(टीडीआर) दिला जाणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावावर मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. त्या बदल्यात जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी या स्मारकाच्या भूमिपूजनाला एनटीसीने परवानगी दिल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
राज्यात होत असलेल्या महापालिका आणि नगरपालिका निवडणुका तसेच बिहार विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर येत्या ११ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन होणार असून त्यानिमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी भाजपने सुरू केली आहे. या समारंभाची जय्यत तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. स्मारकासाठी लागणाऱ्या जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. जमीन हस्तांतरणाबाबत केंद्र सरकार आणि एनटीसीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठराव मंजूर होणे अद्याप बाकी आहे. मात्र एनटीसीने भूमिपूजन सोहळ्यास मान्यता दिली असल्याने या सोहळ्यानंतर हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. साडेबारा एकरच्या बदल्यात एनटीसीला ९७३ कोटींचा टीडीआर दिला जाणार असून या प्रस्तावासही एनटीसीने मान्यता दिली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाणार असून त्यात आरक्षणाच्या जमिनीचा वापर करताना दुप्पट टीडीआर मंजूर करण्याचे प्रस्तावित असून त्याचा वापर उपनगरातही करण्याची मुभा एनटीसीला देण्यात आली आहे.