मुंबई : वांद्रे येथील भारत नगरामध्ये नमाज कमिटी मशिदीलगतच्या एका चाळीचा काही भाग शुक्रवारी सकाळी ६ च्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत ११ जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तातडीने घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाने मदतकार्य सुरू केले असून ढिगाऱ्याखाली आठ ते दहा जण अडकल्याची भिती व्यक्त होत आहे.
वांद्रे परिसरातील भारत नगरमधील दोन मजली चाळ क्रमांक ३७ चा काही भाग शुक्रवारी सकाळी ६ च्या सुमारास पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य हाती घेतले. तसेच, पोलीस, महापालिकेच्या विभाग कार्यालयातील संबंधित अधिकारी – कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कोसळलेल्या चाळीच्या भागाच्या ढागाऱ्याखाली आठ ते दहा जण अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत असून अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या काही रहिवाशांची सुटका केली. या दुर्घटनेत ११ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी वांद्रे येथील भाभा रुग्णलाय नेण्यात आले. जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अग्निशमन दलाने सकाळी ६ वाजून १९ मिनिटांनी दुर्घटना वर्दी क्रमांक १ ची असल्याचे घोषित केली. दुर्घटना घडलेला परिसर चिंचोळा असल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना मदतकार्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. अग्निशमन दलाने सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी दुर्घटनेला वर्दी क्रमांक २ घोषित केली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य करीत आहेत. आठ ते दहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या ११ पैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. इतर आठ जखमींची प्रकृती स्थिर आहे.