कंपन्यांकडून सेवा देण्यास नकार, एमएमआरसी कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात

मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ – आरे मेट्रो ३’ मार्गिकेवरील ‘बीकेसी – आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) टप्पा २ अ’चे मोठ्या गाजावाजा करीत लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर शनिवारपासून (१० मे) हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्याने आरे – वरळी नाका प्रवास केवळ ३६ मिनिटांत होत आहे, मात्र या प्रवासादरम्यान मोबाइल सेवा ठप्प होत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

वोडाफोन आणि एअरटेल कंपन्यांनी नेटवर्क सेवा बंद केली असून जिओने तर नेटवर्क सेवा पुरविण्यास नकार दिला आहे. परिणामी, प्रवाशांना ई – तिकीटाऐवजी कागदी तिकीट काढावे लागत आहे. मोबाइल सेवा बंद होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. याचा परिणाम प्रवासी संख्येवर होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे आता मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी) आता मोबाइल कंपन्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करीत आहे. याबाबत लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतील ‘आरे – बीकेसी टप्पा १’ ऑक्टोबर २०२४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला तेव्हा या मार्गिकेवर वोडाफोन आणि एअरटेल कंपन्यांनी आपली नेटवर्क सेवा उपलब्ध करून दिली. त्यामुळे हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला तेव्हा या कंपन्यांचे कार्ड वापरणाऱ्या प्रवाशांची कोणतीही गैरसोय प्रवासादरम्यान होत नव्हती. मात्र जिओने नेटवर्क सेवा उपलब्ध करण्यास नकार दिला असून जिओचे कार्ड वापरकर्त्यांची मोठी गैरसोय होत आहे.

जिओने नेटवर्क सेवा उपलब्ध करून द्यावी यासाठी एमएमआरसीकडून पाठपुरावा सुरू होता. मात्र नेटवर्क सेवेसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काचे कारण देत जिओने सेवा देण्यास नकार दिला. शुल्क भरमसाठ असल्याचा आरोप केला. दरम्यान, वोडाफोन आणि एअरटेलचे नेटवर्क असल्याने या कंपन्यांचे कार्ड वापरणाऱ्या प्रवाशांची सोय होत होती. मात्र आता वोडाफोन आणि एअरटेलने आपली नेटवर्क सेवा अचानक बंद करून एमएमआरसीच्या अडचणी वाढविल्या आहेत.

दोन दिवसांपासून भुयारी मेट्रो मार्गिकेवर प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांचे मोबाइल बंद पडत आहेत. त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत असून प्रवाशांमध्ये नाराजी आहे. शनिवारपासून बीकेसी – आचार्य अत्रे चौक टप्पा सुरू झाला असून हा टप्पा सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच वोडाफोन आणि एअरटेलने आपली नेटवर्क सेवा बंद केली आहे. त्यामुळे एमएमआरसीच्या अडचणी वाढल्या असून त्याचा प्रवासी संख्येवर परिणाम होण्याची भीती आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोबाइल सेवा बंद पडत असल्याने प्रवाशांनी ई – तिकीट घेता येत नसल्याचे, मेट्रो स्थानकात प्रवेश केल्याबरोबर मोबाइलवरील संभाषण बंद होत असल्याने प्रवाशांमधील नाराजी वाढत आहे. ही बाब लक्षात घेता आता एमएमआरसीने नेटवर्क सेवा अचानक बंद करणाऱ्या आणि नेटवर्क सेवा पुरविण्यास नकार देणाऱ्या मोबाइल कंपन्यांविरोधात कायेदशीर कारवाई करता येईल का यादृष्टीने विधि विभागामार्फत चाचपणी सुरू केल्याची माहिती एमएमआरसीमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिली.