मुंबई : सायबर भामटे आता अधिक धोकादायक बनू लागले आहे. अंधेरी येथील एका अभियंत्याचा फोन हॅक न करता त्याच्या मोबाइलमध्ये प्रवेश मिळवला आणि त्याच्या नावावर सुमारे १५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. माझा फोन हॅक झाला नाही, मी कुठल्याली लिंकला क्लिक केले नाही किंवा काही संशयास्पद ॲप डाऊनलोड केले नाही, असा दावा तक्रारदार अभियंत्याने केला आहे. या नव्या कार्यपध्दतीने पोलिसही चक्रावले आहेत. पश्चिम सायबर विभागात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार पवईतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत आयटी अभियंता म्हणून काम करतो. त्याला २० फेब्रुवारी २०२५ रोजी क्रे़डीटो २४ नावाच्या कंपनीतून एक कॉल आला. त्याने या कंपनीतून १३ हजार ५०० रुपये कर्ज घेतले असून त्याचे हफ्ते भरलेले नाहीत, असे या कंपनीने सांगितले. ते ऐकून अभियंत्याला धक्का बसला. त्याने या कंपनीकडून कधीही कर्ज घेतले नव्हते. यासंदर्भात कंपनीने पडताळणी केली असता फिर्यादी अभियंत्याच्या आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रांच्या आधारे हे कर्ज देण्यात आले होते. कुणी तरी त्याच्या कागदपत्रांचा गैरवापर करून हे कर्ज घेतल्याचे त्याच्या लक्षात आले.
यानंतर या अभियंत्याने आपल्या क्रेडिट पात्रतेचे प्रतिनिधित्व करणारा एक अंक (सीबील स्कोर) तपासला. तेव्हा त्याला आणखी दोन कंपन्यांकडून त्याच्या नावाने कर्ज घेतल्याचे समजले. पुनावाला फिनकॉर्प कंपनीकडून ३ लाख आणि किश्त फायनान्शिअल कंपनीकडून ८० हजार रुपये कर्ज काढल्याचे आढळून आले. याशिवाय अज्ञात सायबर ठकसेनाने त्याच्या आयसीआयसीआय क्रेडिट कार्डाचाही गैरवापर केला होता.
माझा फोन हॅक झालेला नाही, मला कुठलाही संशयास्पद मेसेज आला नाही किंवा मी कुठल्याही लिंकवर क्लिक केलेले नाही, काही डाऊनलोड केलेल नाही, असे अभियंत्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. सायबर ठकसेनाने त्याच्या मोबाइलमध्ये कुठल्या तरी मार्गाने प्रवेश मिळवला आणि सुमारे १५ लाखांचे कर्ज घेतले, असे त्याने तक्रारीत म्हटले आहे. या तीन कंपन्यांमध्ये ८ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत हे कर्ज घेतल्याचे त्याने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी मुंबईच्या पश्चिम सायबर विभागाने भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३१९ अन्वये फसवणुकीचा, तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.