लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : ‘कलाकाराच्या आयुष्यात यशाचे चढते क्षण असतात, तसे अनेक उतारही असतात आणि मी हा काळ अनुभवला आहे. मायबाप प्रेक्षक तुमचे कौतुकही करतात आणि कधी कधी तुमच्या कामावर टीकाही करतात’, असे सांगत कलाकारांना यश – अपयश दोन्ही क्षणांत लोकप्रियता जपता आली पाहिजे’, असे स्वानुभवाचे बोल प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव याने ऐकवले.
सहकुटुंब हसत खेळत प्रत्येकाला अंतर्मुख करणारा शिवराज वायचळ दिग्दर्शित ‘आता थांबायचं नाय’ हा मराठी चित्रपट १ मे २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या चमूने ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला भेट देत मनमोकळा संवाद साधला. या चर्चेत प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री किरण खोजे, प्राजक्ता हनमघर, झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर सहभागी झाले होते. यावेळी चित्रपटातील स्वतःच्या भूमिकेबद्दल सांगताना सिद्धार्थ जाधवने मनोरंजनसृष्टीतील स्वतःच्या वाटचालीबद्दलही सांगितले.
‘मी जेव्हा मनोरंजनसृष्टीत काम करायला सुरूवात केली होती, तेव्हा माझ्या कामाचे भरभरून कौतुक केले गेले आणि आपणही सिद्धार्थ जाधवसारखे काम करू शकतो, अशी युवा कलाकारांना स्फूर्ती मिळाली. पण कलाकाराच्या आयुष्यात यशस्वी क्षणांसह अनेक उतारही असतात आणि मी हा काळ अनुभवला आहे. नटांना लोकप्रियतेचा शाप आहे, ही महत्त्वाची गोष्ट माझा भाऊ नेहमी सांगतो. मायबाप रसिकप्रेक्षक तुमचे कौतुकही करतात आणि तुमच्या कामावर टीकाही करतात. त्यामुळे लोकप्रियता कशी सांभाळावी, याचे गणित जुळवता आले पाहिजे. कलाकाराच्या पलीकडे एक माणूस म्हणून माझे पूर्वीचे व आताचे दिसणे, पूर्वीची व आताची शैली आणि पूर्वीचे व आताचे काम आदी विविध गोष्टींवर बोलले गेले आहे. परंतु काळानुरूप एक नट म्हणून या सर्व गोष्टी मी सकारात्मकतेने घेत आहे. कोणीही परिपूर्ण नसते, अपूर्ण गोष्टींमधून शिकता आले पाहिजे’, असे मत सिद्धार्थ जाधव याने व्यक्त केले.
आपल्या दैनंदिन जीवनाच्या अडचणीतून वाट काढत आपल्या स्वप्नपूर्तीसाठी, यशासाठी झेप घेताना तुमच्या-आमच्या सारख्या एका सामान्य माणसाला कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते, हे ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटातून मांडण्यात आले आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत, झी स्टुडिओज, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले, अरविंद जगताप आणि शिवराज वायचळ यांनी केले आहे.
‘माझ्यासाठी ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट खूप खास आहे. ही एक खरी घटना आहे आणि एका नटासाठी वास्तववादी भूमिका साकारणे खूप महत्त्वाचे असते आणि मी साकारलेले मारुती कदम हे पात्र मी खऱ्या आयुष्यातही जवळून अनुभवले आहे. ‘आता थांबायचं नाय’ ही गोष्ट तग धरून राहायची, आजची, आपली, नात्याची, कुटुंबाची, एका बापाची आणि प्रत्येकाची आहे. एक माणूस आणि कलाकार म्हणून ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट मला प्रेरणा देणारा आहे’, अशी भावनाही सिद्धार्थ जाधव याने व्यक्त केली.