मुंबई :  कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार करताना  परंपरागत वास्तूंच्या संवर्धनात शासन कोणत्याही प्रकारचा तडजोडीचा मार्ग स्वीकारणार नाही. या ठिकाणचे पुरातत्त्व व स्थापत्यशास्त्रीय मूल्य आहे. हे आस्थेचे, श्रद्धेचे आणि निष्ठेचे स्थान आहे. त्यामुळे धार्मिक भावना आणि परंपरेचा आदर करूनच मंदिर जीर्णोद्धाराची कामे केली जातील, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सोमवारी येथे सांगितले.

कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धारासंदर्भात  ॲड.शेलार यांच्या अध्यक्षतेखाली प्रभादेवी येथील पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत बैठक झाली. या बैठकीस आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार श्रीकांत भारतीय, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी, धाराशिवचे जिल्हाधिकारी पुजारा, पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक डॉ.तेजस गर्गे,  तसेच मंदिराचे महंत, पुजारी आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या श्रीलक्ष्मी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होत्या.

 गाभाऱ्याच्या मजबुतीकरणासोबतच धार्मिक परंपरा आणि श्रद्धेला बाधा न आणता उपाय शोधण्यावर शासनाचा भर आहे. मंदिराच्या कळसाबाबत तसेच गाभाऱ्याच्या दुरुस्तीबाबत पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (एएसआय) आणि आयआयटीतील तज्ज्ञांची मदत घेण्यात यावी. त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी बाह्य तज्ज्ञांची  मदत घेतली जावी. याबाबतचा संपूर्ण अहवाल एक महिन्यात तयार करण्यात यावा, अशा सूचना शेलार यांनी या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, मंदिर परिसरातील अन्य सुरू असलेली कामे थांबविण्याची आवश्यकता नसल्याचेही शेलार यांनी स्पष्ट केले.

कुलस्वामिनीचे हे परंपरागत, धार्मिक आणि सांस्कृतिक स्थान आहे. त्यामुळे श्रद्धा, परंपरा आणि विज्ञान यांचा समन्वय साधत संवर्धनाची दिशा ठरवली जावी. संवाद आणि समन्वयातून या विषयावर  निर्णय घेतला जावा. याबाबतचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मान्यतेने पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे शेलार यांनी नमूद केले.