मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) २०११ मधील प्रस्तावित वांद्रे – कुर्ला रेल्वे मार्गिकेचे संरेखन रद्द केले. मेट्रो मार्गिकेने वांद्रे आणि कुर्ला परिसर जोडला जाणार असल्याचे सांगत एमएमआरडीएने हे संरेखन रद्द केले होते. मात्र वांद्रे – कुर्ला परिसर मेट्रो मार्गिकेने जोडलाच नाही. ही फसवणूक असून एमएमआरडीएच्या अशा कारभारामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर हे संरेखन का रद्द केले यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी शुक्रवारी एमएमआरडीएला दिले.

त्याच वेळी वांद्रे – कुर्ला रेल्वे मार्गिकेच्या अनुषंगाने पुन्हा व्यवहार्यता तपासणी करता येईल का यासंबंधीचाही अहवाल सादर करण्याचे आदेश शेलार यांनी दिले आहेत. त्यामुळे भविष्यात वांद्रे – कुर्ला रेल्वे मार्गिका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भविष्यात वाढती गर्दी लक्षात घेऊन वांद्रे आणि कुर्ला परिसर रेल्वेने जोडण्यासाठी १९६५ मध्ये वांद्रे – कुर्ला रेल्वे मार्गिका प्रस्तावित केली होती. या रेल्वे मार्गिकेचे संरेखनही तयार करण्यात आले होते.

भविष्यात ही मार्गिका होईल असे वाटत असतानाच २०१० मध्ये एमएमआरडीएने हे संरेखन रद्द करण्यासाठी सूचना-हरकती मागविल्या. यावर नागरिकांनी हरकती घेतल्या, मात्र एमएमआरडीएने लवकरच वांद्रे आणि कुर्ला परिसर ‘अंधेरी पश्चिम – मंडाळे मेट्रो २ ब’ मार्गिकेने जोडले जाणार असल्याने रेल्वे मार्गिकेची गरज नाही, असे स्पष्ट करीत २०११ मध्ये रेल्वे मार्गिकेचे संरेखन रद्द केले. यासंबंधीची अधिसूचना २०१८ मध्ये जारी करण्यात आली.

त्यानंतर ‘मेट्रो २ ब’च्या मार्गिकेचे काम सुरू करण्यात आले. या मार्गिकेचे काम सध्या वेगात सुरू आहे. मात्र एमएमआरडीएने ‘मेट्रो २ ब’ मार्गिका वांद्रे आणि कुर्ला परिसराशी थेट जोडलीच नाही. आजघडीला वांद्रे आणि कुर्ला येथे वाहतूक कोंडीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. दरम्यान, एमएमआरडीएने एकप्रकारे मुंबईकरांची फसवणूक केल्याचा आरोप करीत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी काही वर्षांपूर्वी याबाबत राज्य सरकारकडे तक्रार केली होती. त्यानुसार सरकारने यासंबंधीचा अहवाल एमएमआरडीएकडे मागवला होता. हा अहवाल सादर झाला, पण तो सार्वजनिक न करता दडविण्यात आल्याचा आरोप करीत रेल्वे मार्गिकेच संरेखन रद्द करण्यात आल्याबाबत गलगली यांनी सरकारकडे पाठपुरावा सुरूच ठेवला होता. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गलगली यांच्या तक्रारीची दखल घेत शुक्रवारी मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी, एमएमआरडीए, मुंबई महापालिका, रेल्वे, वाहतूक, पोलीस आदी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची एक बैठक शेलार यांनी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ही मार्गिका पुनर्जिवित करण्याची मागणी गलगली यांनी केली. तर एमएमआरडीएने रेल्वेचे संरेखन रद्द केले आणि मेट्रो मार्गिका वांद्रे-कुर्ला परिसराशी जोडली नाही ही एक प्रकारे फसवणूक असल्याच्या आरोपांची शेलार यांनी गंभीर दखल घेतली. हे संरेखन नक्की का रद्द केले यासंबंधीचा अहवाल नव्याने सादर करण्याचे आदेश शेलार यांनी एमएमआरडीएला दिले. तर वांद्रे – कुर्ला रेल्वे मार्गिकेच्या संरेखनाची व्यवहार्यता तपासणीसंबंधीचा अहवालही देण्यास त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे वांद्रे – कुर्ला रेल्वे मार्गिका पुनर्जिवित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास वांद्रे, कुर्ला, दादर, घाटकोपर आदी ठिकाणची गर्दी कमी होण्यास मदत होईल असे यानिमित्ताने म्हटले जात आहे.