मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती सत्तेत आल्यानंतर महापालिका प्रशासनात तरुण विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी एक नवीन इंटर्नशिप (आंतरवासिता) कार्यक्रम राबवण्यात येईल, अशी घोषणा मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी केली. या कार्यक्रमाद्वारे तरुण विद्यार्थी शहरी नियोजन आणि महापालिका प्रशासनत सुधारणा करण्यासाठी योगदान देतील, असेही ते म्हणाले.

‘इंडियाज इंटरनॅशनल मुव्हमेंट टू युनायटेड नेशन’ (IIMUN) या युवा संघटनेने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात अमित साटम यांनी नव मतदारांशी संवाद साधला. ही संस्था जगातील सर्वात मोठी युवा-संचालित संस्थांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या कार्यक्रमाची संकल्पना आणि नेतृत्व आयआयएमयूएनचे संस्थापक आणि अध्यक्ष ऋषभ शाह यांची होती.

यावेळी बोलताना साटम म्हणाले की, महापालिका निवडणुकीनंतर आम्ही सार्वजनिक धोरण आणि प्रशासनात रस असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक इंटर्नशिप कार्यक्रम सुरू करणार आहोत. या उपक्रमांतर्गत मुंबईतील २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्ये प्रत्येकी दोन इंटर्न नियुक्त केले जातील आणि पालिका मुख्यालयात दोन इंटर्न नियुक्त केले जातील. या कार्यक्रमात सार्वजनिक धोरण आणि प्रशासनाचे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ५० तरुणांना महापालिका व्यवस्थेचे निरीक्षण करण्यासाठी, सुधारणा सुचवण्यासाठी आणि शहरी नियोजन आणि महापालिका प्रशासन मजबूत करण्यासाठी संशोधन पेपर तयार करण्याची संधी मिळेल.

पालिका निवडणुकीनंतर हे विद्यार्थी या कार्यक्रमांतर्गत महापालिकेत सक्रियपणे काम करतील, असे साटम म्हणाले. यामध्ये स्पष्ट निकषांसह व्यावसायिक निवड प्रक्रियेद्वारे पात्र उमेदवारांची निवड होईल, असेही आश्वासन साटम यांनी यावेळी दिले.

पूरस्थितीवर उपाय शोधण्यासाठी अभ्यासगट

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून पूरस्थिती निर्माण होते. यावर उपाय शोधण्यासाठी आयआयटी आणि व्हीजेटीआयच्या तज्ज्ञांचा समावेश असलेला एक अभ्यास गट स्थापन करण्यात येणार असल्याचेही यावेळी साटम यांनी सांगितले. हा अभ्यास गट महापालिकेचे माजी महानगरपालिका आयुक्त आणि पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे माजी मुख्य अभियंत्यांचे मत घेईल. अभ्यास गट मुंबईच्या भूप्रदेशरचनेचे आणि सरासरी वार्षिक पावसाचे विश्लेषण करेल आणि शहरात पूर रोखण्यासाठी प्रभावी योजना आखण्यासाठी मुंबईसारखा पाऊस असलेल्या इतर आंतरराष्ट्रीय शहरांशी त्याची तुलना करेल, असेही साटम यांनी सांगितले.

रस्ते, पूर, मोकळ्या जागा, कचरा व्यवस्थापन, पर्यावरण, पदपथ आणि सुरक्षितता यासारख्या शहराच्या विविध समस्यांवरही साटम यांनी यावेळी भाष्य केले. तसेच मुंबईविषयाचे व्हिजन मांडले.