मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारानंतर रखडलेले खातेवाटप अखेर रविवारी जाहीर झाल़े  गृह, अर्थ, महसूल, ग्रामविकास, जलसंपदा, सहकार, उर्जा, गृहनिर्माण ही सर्व महत्त्वाची खाती भाजपने स्वत:कडे ठेवून सरकारमध्ये आपले वर्चस्व अधोरेखित केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खाते कायम ठेवले असून, गृह आणि अर्थ ही सर्वात प्रभावी खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. आधीच्या उद्धव ठाकरे सरकारमध्ये शिवसेनेकडे असलेल्या मंत्र्यांची खाती शिंदे गटाकडे कायम ठेवण्यात आली आहेत. राष्ट्रवादीकडे असलेली सर्व प्रभावी आणि मलईदार खाती भाजपच्या वाटय़ाला गेली आहेत. शिंदे गटाकडे नगरविकास, परिवहन, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक न्याय, कृषी, सार्वजनिक बांधकाम (रस्ते विकास मंडळ), पणन, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, अल्पसंख्याक, उद्योग, पाणीपुरवठा, बंदरे, खाणकाम, अन्न व औषधे प्रशासन, शालेय शिक्षण ही खाती आली आहेत.

गृह, अर्थ, महसूल, सहकार, उर्जा, गृहनिर्माण, जलसंपदा, ग्रामविकास, आदिवासी विकास, वैद्यकीय शिक्षण ही सर्व महत्त्वाची खाती भाजपकडे राहणार आहेत. भाजपमध्ये खातेवाटपाच्या यादीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र निकटवर्तीयांच्या वाटय़ाला महत्त्वाची खाती आली आहेत. मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य ही खाती सोपविण्यात आली आहेत. आधीच्या फडणवीस सरकारमध्ये चंद्रकांतदादांनी महसूल, सार्वजनिक बांधकाम, सहकारसारखी महत्त्वाची खाती भूषविली होती. या तुलनेत उच्च व तंत्रशिक्षण वा वस्त्रोद्योग ही दुय्यम खाती मानली जातात. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे त्यावेळी अर्थ आणि वने ही खाते होती. आता त्यांच्याकडे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्सव्यवसाय या खात्यांचा पदभार सोपविण्यात आला आहे.

औरंगाबादच्या अतुल सावे यांच्याकडे सहकार आणि इतर मागास व बहुजन कल्याण ही खाती सोपवून मराठवाडय़ात नवे नेतृत्व पुढे आणण्याच्या दृष्टीने भाजपने पाऊल टाकले आहे. मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याबद्दल टीका होत असतानाच महिला आणि बालविकास हे खाते मुंबईतील नामांकित विकासक मंगलप्रभात लोढा यांच्याकडे देण्यात आले असून, पर्यटन आणि कौशल्य विकास ही अन्य दोन खातीही त्यांच्याकडे आहेत. गिरीश महाजन यांच्याकडील पूर्वीचे वैद्यकीय शिक्षण खाते कायम ठेवण्यात आले असून, ग्रामीण भागात पक्ष वाढविण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारे ग्रामविकास व पंचायती राज हे खाते सोपविण्यात आले आहे. वादग्रस्त अशी प्रतिमा असलेल्या डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडे आदिवासी विकास हे खाते सोपवून आदिवासी भागात भाजपची ताकद वाढविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.

शिंदे गटातही धक्कातंत्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात मंत्रिपदे आणि चांगल्या खात्यांसाठी रस्सीखेच आणि स्पर्धा होती. शिंदे यांच्या गटातील काही मंत्र्यांच्या आधीच्या खात्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. दादा भुसे यांच्याकडे कृषी हे राज्याच्या ग्रामीण भागाशी संबंधित खाते होते. नव्या रचनेत अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषी तर भुसे यांच्याकडे बंदरे व खाणकाम ही तुलनेत दुय्यम खाती सोपविण्यात आली आहेत. शिंदे गटात विलंबाने सामील झालेल्या उदय सामंत यांच्याकडे उद्योग खाते सोपविण्यात आले आहेत. शिंदे गटात दाखल होण्यापूर्वी सामंत यांनी हे खाते मिळावे, अशी अट घातली होती, अशी चर्चा आहे. शिंदे गटाची बाजू माध्यमांमध्ये मांडणारे दीपक केसरकर यांच्याकडे शालेय शिक्षण व मराठी भाषा ही खाती सोपविण्यात आली आहेत.

विखे-पाटील यांचे महत्त्व वाढले

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यानंतर मंत्रिमंडळातील तिसरे स्थान काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांना देण्यात आले आहे. त्यांच्याकडे महत्वाचे महसूल खाते सोपविण्यात आले. विखे-पाटील यांनी भाजप पक्षश्रेष्ठींची मर्जी संपादन केली असून मध्यंतरी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे कट्टर विरोधक असलेल्या विखे-पाटील यांना महसूल खाते देऊन या भागात भाजपचे वर्चस्व वाढविण्यासाठी विखे-पाटील यांच्याकडे महत्वाचे खाते सोपविण्यात आल्याची चर्चा आहे.

पाटील, मुनगंटीवार यांना तुलनेने कमी महत्त्वाची खाती

आधीच्या भाजप सरकारमध्ये महत्त्वाची खाती भूषविलेल्या चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तुलनेने कमी महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत़  चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च- तंत्रशिक्षण, संसदीय कार्य व वस्त्रोद्योग आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय ही खाते सोपविण्यात आली आहेत. काँग्रेसमधून भाजपवासी झालेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे महसूल हे महत्त्वाचे खाते सोपविल्याने भाजपमध्ये ज्येष्ठ नेत्यांचे पंख कापण्यात आल्याचे मानले जाते.

तिजोरीची चावी फडणवीसांकडे

’उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, अर्थ, जलसंपदा, उर्जा, गृहनिर्माण ही महत्त्वाची खाती आहेत़ 

’मंत्रिमंडळाच्या विस्तारात पहिल्या टप्प्यात १८ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. राज्यात मुख्यमंत्र्यांसह ४३ जणांचे मंत्रिमंडळ अस्तित्वात येऊ शकते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सध्या २० जणांचे मंत्रिमंडळ असून, अजूनही २३ जणांचा समावेश करता येऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

’पुढील होणारा विस्तार लक्षात घेऊनच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी स्वत:कडे सर्व महत्त्वाची खाती ठेवली आहेत. ’शिंदे यांच्याकडे सध्या नगरविकाससह परिवहन, सामान्य प्रशासन, पणन, सामाजिक न्याय, मदत व पुनर्वसन ही खाती आहेत.