मुंबई : मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात किमान १ हजार कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाला आहे. मात्र सध्या मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांकडून होणाऱ्या चौकशीमध्ये मुख्य सूत्रधारांकडे दुर्लक्ष करून केवळ ३ ते ७ कोटी रुपयांच्या पारंपरिक निविदा राबविणाऱ्या छोट्या ठेकेदारांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. त्यामुळे या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मोकाट फिरत असून मुख्य तक्रारीपासून चौकशी जाणूनबुजून भरकटवली जात आहे, असा आरोप भाजप उपाध्यक्ष आणि विधान परिषदेतील पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे.
पावसाळ्यात मुंबई तुंबण्यापासून वाचविण्यासाठी मुंबई महानगरपालिका दरवर्षी मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी निविदा काढते. या निविदा प्रक्रियेत गेल्या तीन वर्षांमध्ये तब्बल १ हजार कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाला आहे आणि त्यामुळे करदात्या मुंबईकरांची घोर फसवणूक झाली आहे. घोटाळ्याची ही सुरस कथा पालिकेतील अधिकाऱ्यांनी रचल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे. भाजप मुख्यालयात शुक्रवार, ३० मे रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रसाद लाड यांनी वरील आरोप केले.