राज्यातील मंदिरं पुन्हा उघडण्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाने वारंवार घेतलेल्या आक्रमक भूमिका, टीका-टिपण्या आणि वादविवादानंतर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. घटस्थापनेच्या मुहुर्तावर म्हणजेच येत्या ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मिय प्रार्थनास्थळं खुली करण्यात येणार असल्याचं ठाकरे सरकारने काहीच दिवसांपूर्वी जाहीर केलं. करोना प्रतिबंधक सर्व नियम काटेकोरपणे पाळण्याच्या अटीवर भाविकांसाठी पुन्हा एकदा प्रार्थनास्थळं खुली करण्यात येणार आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने देखील काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

५० टक्के क्षमेतेने होणार सुरु

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रांतील सर्व धार्मिक स्थळांमध्ये उपस्थितांची संख्या ही त्या धार्मिक स्थळाच्या क्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत मर्यादित असेल. त्याचप्रमाणे, करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं संपूर्ण पालन करणं आवश्यक असेल. शासनाने वेळोवेळी जाहीर केल्याप्रमाणे सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर तसेच इतर उपाययोजना अनिवार्य असतील, असं मुंबई महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ‘ब्रेक द चेन’अंतर्गत प्रार्थनास्थळं खुली करण्याकरिता सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना महानगरपालिका क्षेत्रांतही पुढील आदेशांपर्यंत जशाच्या तशा लागू असतील असं आयुक्त इकबालसिंह चहल यांनी यांनी नमूद केलं आहे.

…तर कारवाई होणार!

धार्मिक स्थळांमध्ये जाऊन वरीलपैकी कोणत्याही आदेशांची आणि नियमांची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केली तर त्यावर कडक कारवाई होणार असल्याचं देखील महापालिका आयुक्तांकडून सांगण्यात आलं आहे. कोणत्याही व्यक्तीने शासनाच्या नियमांचं पालन करण्यास टाळाटाळ किंवा विरोध केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५१ ते ६० व भारतीय दंड संहिता, १८६० मधील कलम १८८ आणि लागू असणाऱ्या इतर कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल असं महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.