मुंबई : सहा वर्षांपूर्वीच्या करचोरी प्रकरणात अभिनेता अर्जुन रामपाल याच्याविरुद्ध बजावलेले अजामीनपात्र वॉरंट उच्च न्यायालयाने रद्द केले. अर्जुन याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्याचा दंडाधिकाऱ्यांचा आदेश हा यांत्रिकी आणि गूढ स्वरूपाचा असल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली.

दंडाधिकाऱ्यांचा आदेश कायद्याच्या विरुद्ध आणि कोणताही सारासार विचार न करता देण्यात आला होता, असेही न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या सुट्टीकालीन एकलपीठाने अर्जुन याला दिलासा देताना नमूद केले. प्राप्तिकर विभागाने २०१९ सालच्या करचोरी प्रकरणी अर्जुन याच्याविरोधात प्राप्तिकर कायद्याच्या कलम २७६ सी (२) अंतर्गत खटला दाखल केला होता.

या प्रकरणी दंडाधिकाऱ्यांनी अर्जुन याच्याविरोधात ९ एप्रिल रोजी अजामीनपात्र वॉरंट काढले होते. त्याला अर्जुन याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. प्राप्तिकर कायद्याच्या कलम २७६ सी (२) हे कलम जाणूनबुजून कर, दंड किंवा व्याज चुकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीशी संबंधित आहे.

सुनावणीच्या वेळी उपस्थित राहण्यापासून सूट मिळावी या मागणीसाठी आपण दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. तथापि, दंडाधिकाऱ्यांनी आपला अर्ज फेटाळला आणि आपल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले, असा दावा अर्जुन याने उच्च न्यायालयातील अपिलात केला होता. न्यायमूर्ती सेठना यांच्या एकलपीठानेही अर्जुन हा त्याच्यावर दाखल गुन्ह्यात दोषी ठरल्यास त्याला कमाल तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते.

हा गुन्हा जामीनपात्र आहे, तथापि, दंडाधिकाऱ्यांनी अर्जुन याच्याविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट काढताना याचा विचार केलेला नाही आणि जामीनपात्र गुन्ह्यात अजामीनपात्र वॉरंट काढले. यावरून दंडाधिकाऱ्यांचा आदेश हा यांत्रिकी स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट होते, अशी टिप्पणीही एकपीठाने अर्जुन याच्याविरुद्धचे अजामीनपात्र वॉरंट रद्द केले. दंडाधिकाऱ्यांनी डिसेंबर २०१९ मध्ये बजावलेल्या नोटिशीलाही अर्जुन याने आव्हान दिले आहे. न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी १६ जून रोजी ठेवली आहे.

न्यायालयाने काय म्हटले ?

दंडाधिकाऱ्यांनी अर्जुन याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावताना कोणतीही कारणे नोंदवली नाहीत. त्यामुळे, दंडाधिकाऱ्यांचा आदेश हा गूढ स्वरुपाचा असून कोणताही सारासार विचार न करता काढण्यात आल्याचे एकलपीठाने आदेशात नमूद केले, जामीनपात्र गुन्ह्याच्या प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आल्याने अर्जुन याचे नुकसान होऊ शकेल. शिवाय, अर्जुन याचे वकील सुनावणीला उपस्थित होते या वस्तुस्थितीकडेही दंडाधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढताना दुल्रक्ष केले, असेही न्यायमूर्ती सेठना यांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्जुन याचा दावा

दंडाधिकाऱ्यांचा डिसेंबर २०१९ मध्ये नोटीस बजावण्याचा आणि एप्रिल २०२५ अजामिनपात्र वॉरंट काढण्याचा निर्णय चुकीचा आणि मनमानी होता. आपण २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठीची संपूर्ण कर रक्कम भरली होती. फक्त ती उशिरा भरण्यात आली. त्यामुळे, आपण कर चुकवल्याचा प्राप्तिकर विभागाचा आरोप चुकीचा असल्याचा दावा अर्जुन याने याचिकेत केला आहे. दंडाधिकाऱ्यांचा अजामिनपात्र वॉरंट बजावण्याचा आदेश हा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे उल्लंघन करणारा आहे, असेही अर्जुन याने याचिकेत म्हटले आहे. अशा प्रकरणांत वॉरंट काढण्यात येऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी स्पष्ट केल्याकडेही अर्जुन याने याचिकेत लक्ष वेधले आहे.