मुंबई : बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी असलेल्या पात्रता निकषामध्ये बदल करण्याचा निर्णय राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रवेशासाठी आवश्यक असलेली ५० टक्के पर्सेंटाईल गुणांची अट पूर्णपणे काढण्यात आली आहे. यामुळे या अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी इच्छुक अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. पात्रता अट शिथिल केल्यानंतर पात्र ठरणारे विद्यार्थी चौथ्या फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. यासाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली असून, २८ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे.

परिचारिका अभ्यासक्रमाला अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी आणि महाविद्यालयातील जागा रिक्त राहू नये यासाठी भारतीय परिचर्या परिषदेने बी.एस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या पात्रता निकषामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रवेशासाठी आवश्यक असलेली ५० पर्सेंटाईल गुणांची अट काढून टाकण्याचा निर्णय भारतीय परिचर्या परिषदेने घेतला आहे. त्यामुळे बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमासासाठी सीईटी परीक्षेत उत्तीर्ण झालेले सर्वच विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरणार आहेत. सीईटी गुणांची अट शिथिल करताना भारतीय परिचर्या परिषदेने इयत्ता बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र (पीसीबी) आणि इंग्रजी या विषयातून ४५ टक्क्यांनी उत्तीर्ण होण्याची अट कायम ठेवली आहे.

नव्या निकषामुळे पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी यासाठी भारतीय परिचर्या परिषदेकडून प्रवेशाची चौथी फेरी स्थगित करण्यात आली होती. पात्रता निकषात बदल केल्यानंतर पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीतील प्रवेशासाठी नोंदणी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार चौथ्या फेरीसाठीसाठी सीईटी कक्षाकडून नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना २८ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करता येणार असून, आतापर्यंत जवळपास जवळपास ३१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तिसऱ्या फेरीपर्यंत अर्ज दाखल केलेल्या १४ हजार १६७ विद्यार्थ्यांपैकी ९ हजार २५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, चौथ्या फेरीसाठी ६ हजार ७३५ जागा उपलब्ध असून यापूर्वी झालेल्या नोंदणीपैकी ५ हजार १४२ विद्यार्थ्यांचे प्रवेश होणे बाकी आहे.

चौथ्या फेरीचे वेळापत्रक

नव्याने पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी व शुल्क भरण्यासाठी २८ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर २९ सप्टेंबर रोजी उपलब्ध जागांचा तपशील जाहीर करण्यात येणार आहे. २९ सप्टेंबर ते १ ॲाक्टोबर या कालावधीत विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरता येणार आहे. ४ ॲाक्टोबर रोजी चौथी गुणवत्ता यादी जाहीर करून ५ ते १० ॲाक्टोबरदरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालयांत जाऊन विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे.