मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदी काळात मध्य रेल्वेवरील प्रवाशांची रोडावलेली संख्या पुन्हा वाढू लागली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर या विभागातून प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय म्हणजेच आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी, मध्य रेल्वे सर्वाधिक प्रवाशांची वाहतूक करणारी भारतीय रेल्वे ठरली असून प्रवासी वाहतुकीतून मध्य रेल्वेला ७,३११ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

मध्य रेल्वेवरून हजारोंच्या संख्येने लोकल फेऱ्या आणि लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. या रेल्वेगाड्यांच्या तिकीट दरातून मध्य रेल्वेला करोडो रुपयांचा महसूल मिळाला आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, २०२२-२३ या आर्थिक वर्षात १४६.५ कोटी प्रवाशांनी प्रवास केला. तर, २०२३-२४ या आर्थिक वर्षात १५८.३ कोटी प्रवाशांनी प्रवास केला.

हेही वाचा…दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी

प्रवासी संख्येत आठ टक्क्यांची वाढ नोंदवून सर्व विभागीय रेल्वेमध्ये मध्य रेल्वेने प्रथम स्थान पटकावले आहे. याशिवाय, २०२२-२३ या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेला प्रवासी महसूलापोटी ६,४१४ कोटी रुपये मिळाले असून २०२३-२४ या आर्थिक वर्षात ७,३११ कोटी रुपये मिळाले आहेत. यात १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.