मुंबई : ‘अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपबरोबर महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना झाला होता. कारण अर्थातच ईडीपासून सुटका… ती झाल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला… माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता…’ अशा नि:संदिग्धपणे राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते व राज्याचे अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ हे सूचित करतात.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार ऐन भरात आलेला असताना भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचे हे विधान राजकारणास वेगळी दिशा देणारे ठरू शकते. ‘मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते’, हे भुजबळ यांचे विधान आगीत तेल ओतणारे ठरू शकते. दोन वर्षांपूर्वी २ जुलै २०२३ या दिवशी अजितदादांनी शरद पवार यांचा हात सोडला आणि प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे आदी प्रमुख नेत्यांसह ते भाजपच्या आश्रयास गेले. एकनाथ शिंदे यांनी जे शिवसेनेबाबत केले तेच अजितदादांनी राष्ट्रवादीशी केले. दोन्हींतही समान धागा भाजप हाच. तसेच यात आणखी एक साम्य आहे. एकनाथ शिंदे यांच्या अनेक साथीदारांप्रमाणे अजितदादांच्या अनेक साथीदारांवर विविध आरोप होते आणि काहींवर केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया सुरू होत्या. खुद्द अजितदादा हेच ईडीच्या कचाट्यात होते. त्याच भीतीने या सर्वांनी पक्षत्याग करून भाजपशी घरोबा केला असे तेव्हाही बोलले जात होते. भुजबळ यांच्या या कबुलीने या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

हेही वाचा >>>शिवसेना भवनसमोरून सदा सरवणकर यांच्या प्रचारार्थ श्रीकांत शिंदे यांचा रोड शो; महायुतीच्या कार्यकर्त्यांची गर्दी

भुजबळ इतकेच बोलून थांबत नाहीत. ‘दोन-अडीच वर्षे तुरुंगात काढल्यावर जामिनावर असताना मला ईडीची पुन्हा नोटीस आली. वयाच्या पंचाहत्तरीत किती वेळा चौकशांना सामोरे जायचे, असा प्रश्न होता. आधी १०० कोटींच्या आरोपांवरून राष्ट्रवादीचे आणखी एक नेते अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती’, असे सांगून भुजबळ हे देशमुख यांच्या आरोपांचा दाखला देतात. ‘तुरुंगात असताना भाजपमध्ये सहभागी व्हा तरच सुटका होईल’, असा निरोप देशमुख यांना देण्यात आला होता, असा त्यांचा आरोप आहे. तेव्हा आता ते मलाही अडकविण्याचा पुन्हा प्रयत्न करीत असावेत, अशी भुजबळांची प्रतिक्रिया होती. ‘अजूनही तुरुंगातील दिवस आठवले की माझी झोप उडते. आता या वयातही ईडी माझा पिच्छा सोडायला तयार नाही’, असे भुजबळ म्हणतात. हा सारा तपशील ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘२०२४ : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात नोंदवण्यात आला आहे. या पुस्तकातील ‘हमारे साथ ईडी है’ या शीर्षकाच्या प्रकरणात राज्यातील राजकारण आणि पक्ष फोडाफोडीच्या राजकारणामागील कथित सत्य आढळते. ‘अजित पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, नवाब मलिक अशा विविध नेत्यांना ईडीच्या चौकशांना सामोरे जावे लागले होते. मला, देशमुख व मलिकांना ईडीने अटक केली होती. अशा वेळी पंतप्रधान मोदी वा भाजपबरोबर हातमिळवणी केल्याशिवाय सुटका नाही ही साऱ्यांचीच भावना झाली होती. हा विषय आम्ही पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडला. पवारांना हे सारे समजत होते. पण ते भाजपबरोबर जाण्यास अनुकूल नव्हते. तेव्हा अखेर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांनी भाजपबरोबर हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पक्षाच्या बहुतांशी नेत्यांना मान्य होता. भाजपबरोबर गेल्याने ईडीच्या जाचापासून साऱ्यांची सुटका झाली’, अशी भावना भुजबळांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>>यंदाच्या खरीप हंगामात विक्रमी अन्नधान्य उत्पादन होणार; जाणून घ्या, केंद्र सरकारचा पीकनिहाय उत्पादनाचा अंदाज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार यांचीही ईडीने चौकशी सुरू केली होती. साखर कारखान्याच्या विक्रीवरून अजित पवार यांना घेरण्यात आले होते. या कारखान्यात सर्वाधिक भागभांडवल हे अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावे होते. कदाचित पत्नीला अटक होऊ शकते, असे अजित पवारांच्या निदर्शनास आणून देण्यात आले तेव्हा अजितदादांनाही घाम फुटला होता, अशी माहिती राष्ट्रवादीच्याच एका नेत्याने दिली. यानंतर अजित पवार यांनी लगेचच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह शरद पवारांची भेट घेतली होती. यावर तोडगा कसा काढायचा यावर खल झाला. प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात ईडीची कारवाई झाली. त्यांच्या इमारतीमधील चार मजले ईडीने जप्त केले. सुनील तटकरे यांचीही ईडी चौकशी सुरू झाली होती. या तिन्ही नेत्यांनी भाजपबरोबर हातमिळवणी करू, अशी शरद पवारांकडे बाजू मांडली होती. शरद पवारांनी भाजपबरोबर जाण्यास नकार दिल्यावर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी भाजपच्या नेत्यांबरोबर पुन्हा वाटाघाटी सुरू केल्या. भाजपबरोबर हातमिळवणी करण्याच्या बदल्यात ईडीची चौकशी सुरू असलेल्या नेत्यांची प्रकरणे बंद केली जातील वा त्यासाठी यंत्रणेकडून पाठपुरावा केला जाणार नाही. पण प्रफुल्ल पटेल यांनी या दाव्याचा इन्कार केला. ‘आमच्यासमोर विखुरलेले विरोधक की स्थिर सरकार देणारे मोदी असे दोन पर्याय होते. आम्ही स्थिर सरकारला प्राधान्य दिले’ असा दावा पटेल यांनी केला.