मुंबई : मुंबईतील घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात याव्यात, परवडणाऱ्या घरांची संख्या वाढावी यासाठी गेल्या १० वर्षांमध्ये विकासक आणि त्यांच्या संघटनांनी केलेल्या मागण्यांची पूर्तता करण्यात आली. त्यांना सवलती देण्यात आल्या. पण १० वर्षांमध्ये घरांच्या किमती कमी झाल्या नाहीत, अशी खंत व्यक्त करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासकांची कानउघाडणी केली. क्रेडाय-एमसीएचआयतर्फे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याचे आमचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका वर्षात इमारती उभ्या करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे, ते तंत्रज्ञान आणा, आम्ही आवश्यक ती मदत करू, असेही ते यावेळी म्हणाले.

मुंबई महानगर प्रदेशासाठी (एमएमआर) क्रेडाय-एमसीएचआयकडून नवीन समिती नियुक्त करण्यात आली आहे. नवनियुक्त अध्यक्ष सुखराज नाहर यांनी मावळते अध्यक्ष डॉमिनिक रोमल यांच्या हस्ते पदभार स्वीकारण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मुंबई झोपडपट्टीमुक्त करणे आणि सर्वसामान्यांना परवडणारी घरे देणे ही दोनच आमची मुख्य उद्दिष्ट्ये आहेत. मात्र ही उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी विकासकांकडून आवश्यक ती मदत होत नसल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.

कोणत्याही संघटनेच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर विकासकांकडून कोणत्या ना कोणत्या मागण्या केल्या जातात, त्यानुसार मागील १० वर्षांत विकासकांच्या मागण्या मान्य करून सवलती देण्यात आल्या आहेत. पण इतक्या सवलती देऊनही किमती कमी झाल्या नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

उत्तरेकडील भाग बांधकाम उद्याोगासाठी

मुंबईत पायाभूत सुविधेची कामे सुरू आहेत. सध्या वांद्रे-वर्सोवा सी-लिंक प्रकल्प ६० टक्के पूर्ण झाला आहे. पुढील दोन वर्षांत तो पूर्ण होईल. सी-लिंकला दहिसरपर्यंत आणि नंतर भाईंदरपर्यंत वाढवण्याचे काम सुरू आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग हा मुंबईतील ६० टक्के वाहतूक उचलत आहे. त्याला समांतर अशी जोडणी सी-लिंकपासून भाईंदर -विरारपर्यंत तयार होत असून तो पुढे वाढवण बंदरापर्यंत करण्यात येणार आहे. या सर्वांमुळे उत्तरेकडील संपूर्ण भाग बांधकाम उद्याोगासाठी खुला होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

झोपडपट्टीमुक्तीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणल्यास मदत’

● विकासक झोपडपट्टी योजना घेतात आणि पुनर्वसित इमारती सात-सात, आठ-आठ वर्ष पूर्ण करत नाहीत. त्यामुळे झोपडपट्टीमुक्त मुंबईचे स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही. जर आपल्याला खऱ्या अर्थाने मुंबई झोपडपट्टीमुक्त करायची असेल तर आम्हाला तुमची साथ हवी आहे. ● एका वर्षात इमारती उभारण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान जभरात विकसित झाले आहे, ते तंत्रज्ञान मुंबईत आणा आणि झोपु योजना राबवा. मी तुम्हाला आवश्यक ती मदत करतो. एका वर्षात पुनर्वसित इमारती बांधा आणि विक्री घटकात परवडणारी घरे बांधा. असे झाले तरच झोपडपट्टीमुक्त मुंबईचे स्वप्न पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सर्वोच्च १२ विद्यापीठे वसवण्याची योजना

● अटल सेतूमुळे तिसरी मुंबई उभारण्याची संधी खुली झाली आहे. तिसऱ्या मुंबईत एज्यु सिटी उभारण्यात येणार आहे. ही नवीन मुंबई विमानतळापासून काही मिनिटांच्या अंतरावर असेल.● केंद्र सरकारने परदेशी विद्यापीठांना भारतात येण्याची परवानगी दिल्यामुळे जागतिक दर्जाचे शिक्षण येथे देता येणार आहे. येथे ३०० एकर जमिनीवर जगातील सर्वोच्च १२ विद्यापीठांना वसवण्याची योजना आहे. ● त्यांना जमीन आणि काही सामायिक पायाभूत सुविधा शासनाकडून दिल्या जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

एमएमआर’ जागतिक आर्थिक विकास केंद्र

● पायाभूत सुविधांलगत परवडणाऱ्या घरांची निर्मिती होईल अशी अपेक्षा आम्हाला असते. पण अटल सेतू असो वा इतर कोणताही प्रकल्प, या प्रकल्पालगतच्या घरांच्या किमती कमी होण्याऐवजी गगनाला भिडल्या आहेत, असे ते म्हणाले. ● सरकारकडून तिसरी मुंबई अटल सेतूच्या पायथ्याशी आणि पालघर वाढवण बंदरालगत चौथी मुंबई वसविली जाणार आहे. या चौथ्या, तिसऱ्या मुंबईच्या माध्यमातून एमएमआर जागतिक आर्थिक विकास केंद्र होणार आहे. विकासकांना ही एक चांगली संधी आहे, असेही ते यावेळी म्हणाले.