मुंबई: भारतीय तरुणांमध्ये स्वातंत्र्याचे स्फुलिंग चेतविणाच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ‘बीए’ आणि ‘बॅरिस्टर’ ही पदवी ब्रिटिशांनी काढून घेतली. त्यापैकी ‘बीए’ची पदवी मुंबई विद्यापीठाने परत केली. मात्र, वीर सावरकरांचा सन्मान असलेली ‘बॅरिस्टर’ ही पदवी परत मिळालेली नाही. ती परत मिळविण्यासाठी यासाठी इंग्लंडमधील प्रशासनाशी आवश्यक पत्रव्यवहार करून पाठपुरावा करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुंबई विद्यापीठाच्या वतीने आयोजित ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास आणि संशोधन केंद्रा’च्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची प्रमुख उपस्थिती होती. सावरकरांनी मराठी भाषेला समृद्ध करण्याचे काम केले. त्यांचे हिंदुत्वदेखील विज्ञाननिष्ठ होते. ते व्यक्ती नव्हे तर एक संस्थाच होते. त्यांच्या नावे सुरू होत असलेले संशोधन केंद्राला निधी कमी पडू देणार नाही. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ रवींद्र कुलकर्णी, प्र कुलगुरू अजय भामरे, कुलसचिव प्रसाद कारंडे आदी उपस्थित होते.
विरोधकांना टोला
स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानच्या ज्या तुरुंगात शिक्षा भोगत होते. तिथली परिस्थिती अतिशय वाईट होती. तिथे अनेकांवर परिणाम झाला पण सावकरांमध्ये कुठलीही निराशा आली नाही. इतरांना याचिका करण्यात किंवा लवकर सुट्टी मिळावी म्हणून ते मदत करायचे. पण काही मूर्ख त्यांना माफीवीर म्हणतात, अशी टीका फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता केली. दोन वेळा जन्मठेप झालेले ते एकमेव स्वातंत्र्यसैनिक. माफीवीर असा उल्लेख करणाऱ्यांनी अंदमानच्या त्या कोठडीत फक्त ११ तास घालवून दाखवा, मी तुम्हाला पद्मश्री देण्याची शिफारस करेन, असे आव्हानही त्यांनी दिले.
अतिशय गौरवशाली कामगिरी करणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांच्या यादीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा समावेश नव्हता. तो आम्ही करून घेतला, याचा अभिमान आहे. आता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास आणि संशोधन केंद्राची स्थापना करीत आहोत. मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील संकुलात हे केंद्र असेल. या केंद्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याला साजेसा पुतळा उभारणार आहोत, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
शहा यांची अनुपस्थिती
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास आणि संशोधन केंद्राचे उद्घाटन होणार होते. त्याचप्रमाणे सावरकरांवर त्यांचे व्याख्यानही होणार होते. मात्र ऐन वेळी त्यांच्या दौऱ्यात बदल करण्यात आला. लक्ष्मीनारायण मंदिराचा वर्धापन दिन साेहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर ते थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचले. तेथे स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘अनादि मी…अनंत मी‘ या गीताकरिता ‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार-२०२५’ प्रदान केल्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले. दिल्लीतील पावसाची परिस्थिती आणि पद्म पुरस्कार वितरण साेहळ्यासाठी त्यांना जावे लागल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
सावरकरांनी मराठी भाषा समृद्ध केली. विधिमंडळ, चित्रपट, निवृत्तीवेतन असे अनेक शब्द त्यांनी दिले. त्यांचे हिंदुत्वदेखील विज्ञाननिष्ठ होते. ज्यात विज्ञान नाही, ते मला मान्य नाही असे ते परखडपणे सांगायचे. –देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री