तर ‘ठाणे खाडी पूल ३’ दक्षिणेकडील मार्गिकाही होणार वाहतुकीसाठी खुली
मुंबई : नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुर – आमणे या ७६ किमी लांबीच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण गुरुवार, ५ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. इगतपुरी येथील बोगद्यातील उत्तरेकडील मार्गिकेवर दुपारी १२.१५ वाजता लोकार्पणाचा सोहळा पार पडणार असून यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहे.
शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यास संपूर्ण ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे आता नागपूर – मुंबई प्रवास १६ तासांऐवजी आठ तासांत पार करणे शक्य होणार आहे. दरम्यान, गुरुवारी समृद्धी महामार्गातील अखेरच्या टप्प्यासह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) ठाणे खाडी पूल-३ प्रकल्पातील दक्षिणेकडील अर्थात पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री व्हिडिओ काॅन्फरसिंगद्वारे करणार आहेत. ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यास पुणे-मुंबई प्रवास सुकर होणार आहे.
नागपूर – मुंबई अंतर १६ तासांऐवजी केवळ आठ तासात पार करता यावे यासाठी एमएसआरडीसीने ७०१ किमी लांबीचा आणि सुमारे ५५ हजार कोटी रुपये खर्चाचा नागपूर – मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेतला. राज्यातील १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांमधून जाणाऱ्या सहा पदरी शीघ्रगती महामार्गाचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात आले.
७०१ किमी महामार्गातील नागपूर – शिर्डी दरम्यानच्या ५२० किमी लांबीच्या महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आणि हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला. त्यानंतर २६ मे २०२३ रोजी शिर्डी – भरवीर दरम्यानच्या ८० किमी लांबीच्या महामार्गाचे लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. तर भरवीर -ते इगतपुरी दरमयानच्या २५ किमी लांबीच्या महामार्गाचे लोकार्पण सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ४ मार्च २०२४ रोजी झाले.
एकूणच मार्च २०२४ पासून नागपूर – इगतुररी दरम्यानच्या ६२५ किमीचा प्रवास समृद्धी महामार्गामुळे अतिजलद झाला. मात्र नागपूर – मुंबई दरम्यान थेट प्रवास आठ तासांत केव्हा होणार याची प्रतीक्षा सर्वांना होती. इगतपुरी – आमणे हा ७६ किमीचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणे यासाठी गरजेचे होते. त्यानुसार अखेर प्रवाशी-वाहनचालकांची प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे. गुरुवार, ५ जून रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इगतपुरी – आमणे या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण इगतपुरी येथे होणार आहे. हे लोकार्पण झाल्यानंतर काही तासांतच हा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
त्यामुळे गुरुवारपासून मुंबई – नागपूर अंतर समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून आठ तासात पार करणे शक्य होणार आहे. इतगपुरी येथील समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याच्या लोकार्पण सोहळ्यात गुरुवारी ठाणे खाडी पूल-३ प्रकल्पातील पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या दक्षिणेकडील मार्गिकेचेही लोकार्पण मुख्यमंत्री करणार आहेत. ठाणे खाडी पूल १ आणि २ वरील भार कमी करण्यासाठी एमएसआरडीसीने ठाणे खाडी पूल ३ प्रकल्प हाती घेतला. त्यानुसार १.८३७ किमीच्या आणि ठाणे खाडी पूल-२ ला समांतर तीन-तीन मार्गिकांच्या कामाला २०२० मध्ये सुरुवात केली.
ऑक्टोबर २०२४ मध्ये या प्रकल्पातील मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या उत्तरेकडील मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आले. तर आता पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून या मार्गिकेचे लोकार्पण करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. त्यानुसार गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मार्गिकेचे लोकार्पण करण्यात येणार आहे. लोकार्पणानंतर ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यास पुणे-मुंबई प्रवास सुकर होईल.