मुंबई : गेल्या काही वर्षांत ठाणे ते दिवा या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती वाढली. परिणामी ठाणे स्थानकावरील प्रवाशांची गर्दीही वाढली आहे. त्यामुळे दिवा-सीएसएमटी जलद लोकल दिवा येथेही थांबवण्यात यावी, दिव्यामधील रखडलेले प्रकल्प मार्गी लावावेत अशा मागण्यांसाठी अमोल केंद्रे आमरण उपोषणाला बसले आहेत. मागील तीन दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरू आहे.

लोकलच्या रोजच्या दिरंगाई कारभाराला प्रवासी वर्ग वैतागले असून आंदोलनाच्या तयारीत आहेत. त्याविरोधात विविध रेल्वे प्रवासी संघटना एकवटून २२ ऑगस्ट रोजी आंदोलनही करणार आहेत. काही दिवसांपूर्वी दिवा स्थानकात प्रवाशांनी काळी फीत लावून, रेल्वे प्रशासनाचा निषेध केला. आता दिवा येथे थांबा मिळावा यासाठी अमोल केंद्रे यांनी दिवा स्थानकाबाहेर उपोषणाला सुरुवात केली आहे. मध्य रेल्वेवरील दिवा स्थानकात वाढणारी गर्दी विभाजित करण्यासाठी दिवा रेल्वे स्थानकावरून थेट सीएसएमटीसाठी लोकल सुरू कराव्यात अशीही मागणी केली आहे.

हेही वाचा >>>अंधेरी भूमिगत मार्ग: यंदाच्या पावसाळ्यात २८ वेळा मार्ग बंद; आमदार अमित साटम यांनी केली परिसराची पाहणी

दिवा येथे घरांच्या किंमती काहीशा परवडणाऱ्या असल्याने गेल्या १० ते १५ वर्षांमध्ये दिवा येथे नोकरदार, कामगार, विद्यार्थी यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. परंतु या भागातील लोकसंख्या वाढली तरी पायाभूत सुविधा, रेल्वे सेवेत फारसा बदल झाला नाही. परिणामी, भरगच्च भरलेल्या लोकलच्या दरवाज्याला लटकून प्रवास करावा लागतो. दिवा स्थानकावरून सध्या दररोज एकूण ४७९ लोकल सेवा धावतात. ज्यात ४२६ धीम्या लोकल असून त्यातील २१७ डाऊन आणि २०९ अप धीम्या लोकल आहेत. तर, ५३ जलद लोकल असून २७ डाऊन आणि २६ अप आहेत. मात्र, दिव्यावरून सीएसएमटीकडे जाण्यासाठी स्वतंत्र लोकल सेवा नाही. दिवा स्थानकात सुमारे १.२६ लाख तिकीट विक्रीतून दैनंदिन महसूल सुमारे ६.६२ लाख रुपये आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या तीन वर्षांपासून दिवा-सीएसएमटी लोकल सुरू करण्यासाठी पाठपुरावा करत आहे. रेल्वे प्रशासनाकडून फक्त आश्वासन देण्याचे काम केले जाते. १६ ऑगस्ट रोजी उपोषण केल्यानंतर रेल्वे पोलीस आणि दिवा स्थानक व्यवस्थापन यांनी भेट घेतली. त्यानंतर कोणीही आले नाही. खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र, त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे.- अमोल केंद्रे, उपोषणकर्ते