मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला एक देश, एक निवडणूक हवी आहे, परंतु विरोधी पक्ष नको आहे, त्यासाठीच केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षांना संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. या लोकसभा निवडणुकीत लोकच आता हुकूमशाहाचा अंत करून लोकशाहीवादी सरकार आणतील, असे त्यांनी म्हटले आहे. हेही वाचा >>> “माझं बोट धरून राजकारणात आले असते तर…”, पंतप्रधान मोदींच्या त्या विधानावर शरद पवारांची फिरकी; म्हणाले… लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या असताना विरोधकांशी सरळ दोन हात करण्याची हिम्मत भाजप व नरेंद्र मोदी यांच्यात नाही, म्हणून ते रडीचा डाव खेळत आहेत. पराभवाच्या भीतीने घाबरलेल्या मोदींनी केंद्रीय संस्थांना हाताशी धरून विरोधी पक्षांना संपवण्याचे कारस्थान सुरू केले आहे. त्याचाच भाग म्हणून झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली. त्यानंतर गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली. काँग्रेस पक्षाला निवडणूक लढवता येऊ नयेत म्हणून पक्षाची खाती गोठवली आहेत. मोदी सरकारने फक्त काँग्रेसची खाती नाही तर या देशातील लोकशाही गोठवली आहे, असे त्यांनी सांगितले.एकीकडे विरोधी पक्षाची आर्थिक कोंडी करायची आणि दुसरीकडे निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजप मात्र कोटयवधी रुपयांची खंडणी वसूल करीत आहे. या निवडणुकीत लोक हुकूमशाहीचा अंत करुन लोकशाही व्यवस्थेचे सरकार देशात आणतील असे पटोले यांनी म्हटले आहे.