महागाईने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्यासाठी वीजदर कमी करण्याची मागणी जोर धरू लागली असल्याने श्रेयाच्या चढाओढीत उडी घेण्यासाठी काँग्रेसने आता रिलायन्स एनर्जीविरोधात दंड थोपटले आहेत. वीजदर कमी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करून खळबळ उडविणारे खासदार संजय निरूपम यांनी आता वीजग्राहकांच्या विविध मागण्यांसाठी १३ जानेवारीला रिलायन्स एनर्जीच्या कार्यालयावर कांदिवली (प.) येथे मोर्चा आयोजित केला आहे.
मुंबईत समान वीजदराची मागणी घेऊन आणि वीजग्राहकांच्या प्रश्नांवर शिवसेनेने गेल्या काही वर्षांत रिलायन्सविरोधात आंदोलने केली होती. आता काँग्रेस खासदार निरूपम यांनी आपला मोर्चा रिलायन्सकडे वळविला आहे. रिलायन्स एनर्जीचे २६ लाख ग्राहक असून त्यांना आकारण्यात येणारे १०० रुपये मासिक भाडे रद्द करण्यात यावे, चिनी बनावटीचे खराब दर्जाचे वीजमीटर बदलण्यात यावेत आणि उत्तम दर्जाचे मीटर बसवावेत, त्याचा निम्मा खर्च कंपनीने करावा, दर महिन्याला आकारण्यात येणारा १० टक्के नियामक मालमत्ता भार (रेग्युलेटरी अॅसेट चार्ज) रद्द करण्यात यावा, आदी मागण्या निरूपम यांनी केल्या आहेत. भाजपला भ्रष्टाचाराबाबत बोलण्याचा अधिकारच नाही, अशी टीका करताना निरूपम म्हणाले, केंद्रात भाजप प्रणित सरकार असताना वीजवितरणाचे खासगीकरण झाले, मुंबई-दिल्ली येथे बीएसईएस कंपनीचा वीजपुरवठा असताना वीजदर कमी होते, ते रिलायन्स एनर्जीकडे सोपविण्यात आल्यावर दर वाढले.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jan 2014 रोजी प्रकाशित
रिलायन्स एनर्जीविरोधात आता काँग्रेसचा शड्डू!
महागाईने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्यासाठी वीजदर कमी करण्याची मागणी जोर धरू लागली असल्याने श्रेयाच्या चढाओढीत उडी घेण्यासाठी

First published on: 05-01-2014 at 03:12 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress mp sanjay nirupam threatens agitation if mumbai power tariff not cut