महागाईने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्यासाठी वीजदर कमी करण्याची मागणी जोर धरू लागली असल्याने श्रेयाच्या चढाओढीत उडी घेण्यासाठी काँग्रेसने आता रिलायन्स एनर्जीविरोधात दंड थोपटले आहेत. वीजदर कमी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करून खळबळ उडविणारे खासदार संजय निरूपम यांनी आता वीजग्राहकांच्या विविध मागण्यांसाठी १३ जानेवारीला रिलायन्स एनर्जीच्या कार्यालयावर कांदिवली (प.) येथे मोर्चा आयोजित केला आहे.
मुंबईत समान वीजदराची मागणी घेऊन आणि वीजग्राहकांच्या प्रश्नांवर शिवसेनेने गेल्या काही वर्षांत रिलायन्सविरोधात आंदोलने केली होती. आता काँग्रेस खासदार निरूपम यांनी आपला मोर्चा रिलायन्सकडे वळविला आहे. रिलायन्स एनर्जीचे २६ लाख ग्राहक असून त्यांना आकारण्यात येणारे १०० रुपये मासिक भाडे रद्द करण्यात यावे, चिनी बनावटीचे खराब दर्जाचे वीजमीटर बदलण्यात यावेत आणि उत्तम दर्जाचे मीटर बसवावेत, त्याचा निम्मा खर्च कंपनीने करावा, दर महिन्याला आकारण्यात येणारा १० टक्के नियामक मालमत्ता भार (रेग्युलेटरी अ‍ॅसेट चार्ज) रद्द करण्यात यावा, आदी मागण्या निरूपम यांनी केल्या आहेत.  भाजपला भ्रष्टाचाराबाबत बोलण्याचा अधिकारच नाही, अशी टीका करताना निरूपम म्हणाले, केंद्रात भाजप प्रणित सरकार असताना वीजवितरणाचे खासगीकरण झाले, मुंबई-दिल्ली येथे बीएसईएस कंपनीचा वीजपुरवठा असताना वीजदर कमी होते, ते रिलायन्स एनर्जीकडे सोपविण्यात आल्यावर दर वाढले.