मंगल हनवते, लोकसत्ता

मुंबई : वाहतूक व्यवस्थेतील लोप पावलेल्या ‘ट्राम’चा पर्याय पुन्हा एकदा मुंबईकरांना उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पुढाकार घेत वांद्रे ते कुर्ला संकुलात (बीकेसी)‘ट्राम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. पण ‘ट्राम’मधून प्रवास करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न अपूर्णच राहणार आहे. संकुलात हा प्रकल्प राबविणे अव्यवहार्य असल्याचा अहवाल सल्लागार कंपनीने दिला असून प्रकल्प गुंडाळण्यात आला आहे.

ट्राम ही १८ व्या शतकातील मुंबईतील वाहतूक व्यवस्थेचा एक पर्याय होती. ९ मे १८७४ रोजी घोडय़ाची ट्राम वाहतूक असणारे मुंबईतले पहिले ट्रॅम फाटे सुरू झाले. पुढे कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट विजेचा पहिला ट्रॅमचा फाटा ७ मे १९०७ ला सुरू करण्यात आला. ३१ मार्च १९६४ ला बोरीबंदर ते दादर असा ट्रामचा अखेरचा प्रवास झाला आणि ट्राम लोप पावली. लोप पावलेला हा पर्याय पुन्हा मुंबईकरांना उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरडीएने वांद्रे कुर्ला संकुलात ट्राम सुरू करण्याचा निर्णय घेतला.

एमएमआरडीएने सुकर आणि जलद पर्याय म्हणून संकुल व परिसरात ट्राम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या प्रकल्पाच्या तांत्रिक आणि आर्थिक अभ्यासाठी नवी दिल्लीतील एका सल्लागार कंपनीची नियुक्ती केली. पर्यावरणस्नेही अशी ही ट्राम बीकेसीतील कानाकोपऱ्याशी तसेच भविष्यात येथून धावणाऱ्या मेट्रो मार्गिकेशी जोडण्याचाही निर्णय घेण्यात आला.

‘ट्राम’ पुन्हा सेवेत येणार असल्याने ही मुंबईकरांना सुखावणारी बाब ठरली. पण ट्राममधून प्रवास करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न अपूर्णच राहिले आहे. सल्लागार समितीच्या अहवालात बीकेसीत हा प्रकल्प राबविणे अव्यवहार्य तसेच सुसाध्य नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकल्प अव्यवहार्य का? : वांद्रे कुर्ला संकुलातील रस्ते अरुंद असल्याने या रस्त्यांवर ट्राम चालविणे शक्य नसल्याचे सल्लागाराने स्पष्ट केले आहे. सल्लागाराचा अहवाल आल्यानंतर प्रकल्पाचा बृहत आराखडा तयार केला जाणार होता. मात्र आता प्रकल्पच अव्यवहार्य ठरल्याने आराखडा तयार करण्याचा निर्णय रद्द केला आहे.