मुंबई : राज्यात शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) संभाव्य युतीबाबत जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. परंतु दोन्ही बाजूकडील नेत्यांमधून उलटसुलट विधाने करण्यात येत असल्याने युती होणार की नाही, यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. ‘युतीबाबत दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये दूरध्वनी झाले असतील, असे सूचक विधान खासदार संजय राऊत यांनी केले. तर ‘२०१४ आणि २०१७ मध्ये शिवसेनेशी युती करण्याचा प्रस्ताव आम्ही दिला होता. तेव्हा बाळा नांदगावकर युतीचा प्रस्ताव घेऊन ‘मातोश्री’वर गेले होते. परंतु उद्धव ठाकरे यांनी भेटही दिली नव्हती. शिवसेनेबाबत आमचा अनुभव काही चांगला नाही, असे मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
‘युतीची चर्चा प्रसार माध्यमांमध्ये होत नसते. त्यासाठी थेट संपर्क करावा लागतो, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी दिली. तसेच युतीबाबत नेमका प्रस्ताव काय आहे, हे राज ठाकरे यांनी सांगितले पाहिजे, असे मत शिवसेनेचे विधानसभा गटनेते भास्कर जाधव यांनी व्यक्त केले. नेत्यांमधील या उलट सुलट विधानांमुळे भविष्यात दोन्ही पक्षांची युती होणार का, यावरून कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.