मुंबई : भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम मिळवून देण्याच्या नावाखाली अंधेरी येथील एका ज्येष्ठ नागरिकाला सायबर भामट्यांनी तब्बल दीड कोटी रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी पश्चिम विभाग सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी ७३ वर्षांचे असून अंधेरीत राहतात. ते राज्य शासनाच्या बंदर विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना शासनाकडून निवृत्ती वेतन मिळते. त्यांना २०२३ मध्ये आलोक मेहता नामक एका व्यक्तीचा फोन आला. आपण दिल्लीतील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून (ईपीएफओ) बोलत असल्याचे त्याने सांगितले.

फिर्यादींच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम शिल्लक असून ती आपण मिळवून देणार असल्याचे त्याने सांगितले. या प्रक्रियेसाठी त्याने फिर्यादींना प्रलंबित सुरक्षा व्यवहार कर व देखभाल शुल्क म्हणून ७ हजार २३० रुपये भरण्यासाठी सांगितले. यानंतर चक्रवर्ती आणि सुनिता तिवारी नामक महिलेने फिर्यादीशी संपर्क साधला. तुमची फाईल पुढील प्रक्रियेसाठी आमच्याकडे आल्याचे त्यांनी सांगितले. या दोघांनी वेगवेगळी कारण देत फिर्यादींकडून पैसे घेतले. नंतर अलोक मेहता याने फिर्यादींना भारत सरकारच्या अर्थमंत्रालयाचे एक पत्र पाठवले. त्यात फिर्यादींना ६३ लाख ८ हजार रुपये मिळतील असे नमूद केले होते. मात्र या रकमेसाठी आधी ३ लाख ८० हजार रुपये भरावे लागतील असे त्यांना सांगण्यात आले. व्हॉटसपवर आलेले ते पत्रे फिर्यांदी याना खरे वाटले आणि त्यांनी मेहता याला आणखी पैसे पाठवले. १४ मे २०२३ ते १२ मार्च २०२४ या कालावधीत त्यांनी आलोक मेहता, चक्रवर्ती आणि सुनिता तिवारी या तिघांना वेगवेगळ्या बॅंक खात्यावर ६० लाख रुपये पाठवले. आज ना उद्या आपल्याला भविष्य निर्वाह निधीचे पैसे मिळतील असे त्यांना वाटत होते.

पुन्हा ८० लाखांची फसवणूक

माही शर्मा नावाच्या महिलेने मार्च २०२४ मध्ये फिर्यादींशी संपर्क साधला. मी सीबीआयमधून बोलत असल्याचे तिने सांगितले. आलोक मेहताला अटक केली आहे. मात्र फिर्यादींना भविष्य निर्वाह निधीचे पैसे मिळवून देण्यासाठी ती फाईल आपल्याकडे आल्याचा दावा तिने केला. तिने फिर्यादींच्या नावाच्या १ कोटी ४० लाख ८१ हजार रुपये रकमेचा धनादेशाचे छायाचित्र त्यांना पाठवले. आपल्या भविष्य निर्वाह निधीचा धनादेश तयार असल्याचे फिर्यादींना खरे वाटले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र या रकमेवर ३० टक्के आयकर भरावा लागेल, असे माही शर्माने सांगतिले. त्यासाठी तिने वेगवेगळे कारणे देत ८० लाख रुपये उकळले. फिर्यादींनी तोपर्यंत १ कोटी ४० लाख रुपये सायबर भामट्यांना पाठवले होते. नंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांनास मजले. यानंतर त्यांनी वांद्रे येथील पश्चिम सायबर विभागात तक्रार दाखल केली.या प्रकरणी सायबर पोलिसांनी आरोपींविरोधात फसवणूक, तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.