मुंबई : गेली अनेक वर्षे नाईलाजास्तव धोकादायक इमारतीत वास्तव्यास असलेल्या गिरणी कामगारांच्या टाटा नगर इमारतीवर मुंबई महानगरपालिकेने गुरुवारी हातोडा चालविण्यास सुरुवात केली. या इमारतीत वास्तव्यास असलेली अनेक कुटुंबे आजही पर्यायी जागेच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र असे असताना ही कारवाई सुरू झाल्याने रहिवासी संतप्त झाले आहेत.

स्वदेशी मिलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी १९६० साली चुनाभट्टी परिसरात टाटा नगर नावाची तीन मजली इमारत बांधण्यात आली होती. त्यावेळी या इमारतीमध्ये १२२ कुटुंबे वास्तव्यास होती. मात्र २००१ मध्ये मिल बंद झाल्याने कंपनीने या इमारतीकडेही दुर्लक्ष केले. त्यामुळे काही वर्षातच या इमारतीची दयनीय अवस्था झाली. आर्थिक स्थिती चांगली असलेल्या रहिवाशांनी इतर ठिकाणी आपला संसार थाटला. मात्र आर्थिक स्थिती बेताची असलेली ४५ कुटुंबे गेल्या दोन वर्षापर्यंत याच इमारतीमध्ये वास्तव्यास होती.

हेही वाचा >>>मुंबई: धमकी देऊन बलात्कार करणाऱ्या आरोपीला पकडण्यात यश

हेही वाचा >>>मुंबई: अनेक वर्षांनंतर राणीची बाग अभ्यासक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजली

मात्र २८ जून २०२२ रोजी कुर्ला नेहरूनगर परिसरात इमारत कोसळून १९ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महानगरपालिकेने तत्काळ टाटा नगरमधील रहिवाशांचे समान बाहेर काढून ही इमारत रिकामी केली. त्यानंतर काही दिवस महानगरपालिकेने या कुटुंबियांची एका शाळेत निवाऱ्याची व्यवस्था केली होती. मात्र त्यानंतर अनेकजण स्वतःहून इतर ठिकाणी भाड्याच्या घरात वास्तव्यास गेले. सध्या या इमारतीमध्ये कोणीही राहत नव्हते. मात्र अनेकांनी आपले काही समान या इमारतीमधील घरात ठेवले होते. महानगरपालिकेचे कर्मचारी कारवाईसाठी आल्याचे कळताच त्यांनी मुळ घराकडे धाव घेतली आणि कारवाईला विरोध केला. मात्र महानगरपालिकेने कारवाई सुरूच ठेवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या अनेक कुटुंबे भाड्याच्या घरात वास्तव्यास आहेत. मात्र बहुसंख्य रहिवाशांची आर्थिक स्थिती बेताची आहे. सरकारने याची दखल घेऊन या परिसरातील संक्रमण शिबिरात रहिवाशांच्या निवाऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी रहिवाशी हेमंत मचिवले यांनी केली आहे.