मुंबई : दरवर्षी साधारणपणे १० जूननंतर मान्सूनचे आगमन होते. यंदा पहिल्यांदाच मे महिन्यात पावसाचे दमदार आगमन झाले. सरासरी ५० मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना आज एकाच दिवसात २५० मिलीमीटरपेक्षा अधिक म्हणजेच ढगफुटीसारखा पाऊस पडला. त्यामुळे मुंबईकर नागरिकांची तारांबळ उडाली, असे उपमुख्यमंत्री आणि शहर जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबई महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला सोमवारी भेट देऊन त्यांनी मुसळधार पावसामुळे निर्माण परिस्थितीचा आढावा घेतला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट दिली. तसेच, मुंबईत पावसाळ्यादरम्यान करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना व आपत्कालीन व्यवस्थापन बाबींचा त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर शिंदे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश महानगरपालिकेला दिले आहेत. दरड प्रवण ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने संरक्षक जाळी बसवण्याचे निर्देश दिले आहेत. दरवर्षी या ठिकाणी दुर्घटना घडत असल्याने स्थानिक रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवावे, असे निर्देश दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. महानगरपालिका प्रशासनानेही रेल्वे प्रशासन, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण, सैन्य दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांच्याशी समन्वय साधून सुनिश्चित नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४२२ ठिकाणी उदंचन पंप

महानगरपालिकेने दरवर्षी सखलभागात पाणी साचणारी ठिकाणे निश्चित केली असून ४२२ ठिकाणी उदंचन संच (पंप) बसविले आहेत. तर २ ठिकाणी साठवण टाक्या आणि १० ठिकाणी लघू उदंचन केंद्र कार्यान्वित केल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. सखलभागात साचलेले पाणी उदंचन पंपाद्वारे उपसण्यात आले. हे उदंचन पंप बंद पडता कामा नयेत, असे निर्देश महानगरपालिका प्रशासनास देण्यात आले आहेत. यंदा पाऊस वेळेआधीच सुरू झाला असला तरी नालेसफाई वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.