मुंबई: ‘विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुन्हा सभागृहात यावे यासाठी माझ्या शुभेच्छा. मी असे म्हटल्यावर उद्धव ठाकरे म्हणतील की, आम्ही त्यांच्या माणसांची पळवापळवी करतो. २०२९ पर्यंत आम्हाला तिकडे (विरोधी पक्षात) येण्यास कोणतीच संधी नाही. पण तुम्हाला इकडे येण्याची संधी आहे. त्याचा विचार वेगळय़ा पद्धतीने करू, अशी टिप्पणी करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेत खुले निमंत्रण दिले. त्यावर अशा गोष्टी खेळीमेळीने घ्यायच्या असतात, असे प्रत्युत्तर देत ठाकरे यांनी याला फारसे महत्त्व दिले नाही.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे २९ ऑगस्ट रोजी सदस्य म्हणून निवृत्त होत आहेत. त्यांना बुधवारी निरोप देण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात विरोधकांना चिमटे काढले. दानवे हे १५ वर्षे भाजपमध्ये होते. भाजपमधून ते आमच्या एकेकाळच्या मित्रपक्षात गेले. आजही तो (ठाकरे पक्ष) मित्रपक्ष आहे. त्यांना सत्तेत येण्याची संधी आहे. पण आम्हाला २०२९ पर्यंत विरोधी पक्षात जाण्यात आता ‘स्कोप’ उरलेला नाही, अशी मल्लीनाथी फडणवीस यांनी केली.
औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याचे श्रेय हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना द्यावे लागेल, असे फडणवीस म्हणाले. दानवे सोन्याचा चमचा घेऊन राजकारणात आले नाहीत, असा टोला शिंदे यांनी ठाकरे यांना उद्देशून मारला होता. तो संदर्भ घेत ठाकरे यांनी, दानवे यांनी सोन्याने भरलेल्या ताटाला बघून पक्षाशी प्रतारणा केली नाही, असा प्रति टोला लगावला.
‘शरद पवारांनी सावरकरांना विरोध केला नाही’
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सावरकर स्मारकाला जागा दिली होती. त्यांचा कधीही सावरकरांना विरोध नाही असेही फडणवीस यांनी सांगितले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकर यांचे कौतुक करणारे पत्र दिले होते. हे राहुल गांधी यांना कोणीतरी सांगण्याची गरज आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.