मुंबई : एकनाथ शिंदे हेच महायुतीचे मुख्यमंत्री राहणार असून मुख्यमंत्रीपदामध्ये कोणताही बदल होणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्याची पूर्णपणे स्पष्ट कल्पना देण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी स्पष्ट केले.महायुतीतील सर्वात मोठय़ा पक्षाचा नेता म्हणून मी ही घोषणा करीत असल्याचे सांगत यांनी सोमवारी मुख्यमंत्री-बदलाच्या चर्चाना पूर्णविराम दिला. झालाच तर कदाचित मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे त्यांनी नमूद केले. १० ऑगस्टच्या दरम्यान राज्यात नेतृत्वबदल होईल व अजित पवार मुख्यमंत्री होतील, असे भाकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान भवनाच्या प्रांगणात बोलताना केले होते. राष्ट्रवादीचे नेतेही तशी वक्तव्ये करीत होते.

या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला संभ्रम फडणवीस यांनी दूर केला. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप या पक्षातील नेते व कार्यकर्त्यांना आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा, असे वाटणे स्वाभाविक आहे. पण त्यांनी जाहीर बोलताना वास्तवाचे भान ठेवले पाहिजे. महायुतीमध्ये मुख्यमंत्रीबदलाची कोणतीही चर्चा नाही. शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, हे अजित पवार यांनीही स्पष्ट केले आहे. त्यामुळे नेते व कार्यकर्त्यांनी मनात संभ्रम ठेवण्याचे कारण नाही, असे फडणवीस म्हणाले.

अनेकजण राजकीय भविष्यवेत्ते झाले आहेत. महायुतीतील कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न असून १० ऑगस्टचे वायदे केले जात असले, तरी या कालावधीत मुख्यमंत्रीबदल होणार नाही. महायुतीतील नेते व कार्यकर्ते सुजाण असून त्यांनी याबाबतची चर्चा थांबवावी. – देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री