मुंबई : यंदा गणेशोत्सवात एकूण चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत धनिक्षेपकाचा वापर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. गणेशोत्सवातील दुसरा, पाचवा, गौरी विसर्जन आणि अनंत चतुर्दशी या चार दिवशी ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या परिपत्रकात तारखेचा घोळ झाल्यामुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी देण्यासाठी दिवस ठरवून देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने आपल्या अधिकारातील १५ पैकी १३ दिवसांची यादी मार्च महिन्यात जाहीर केली होती. त्यात मुंबईत यंदा गणेशोत्सवात चार दिवस रात्री उशीरापर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु, यामध्ये तारखांचा गोंधळ असल्याचे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे हा घोळ दुरुस्त करावा, अशी मागणी समन्वय समितीने शहर व उपनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठवून केली आहे.

ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० नुसार बंद जागांखेरीज अन्य ठिकाणी सांस्कृतिक किंवा धार्मिक कारणासाठी काही ठराविक दिवसांकरिता सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक किंवा ध्वनिवर्धक यांचा वापर करता येतो. हा कायदा ध्वनीप्रदुषण कमी करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लागू करण्यात आला आहे. त्यात आवाजाची मर्यादा निश्चित केली आहे. श्रोतेगृह, सभागृह, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंदिस्त जागा वगळून त्या ठिकाणी हे ध्वनिक्षेपक लावता येतात.

तारखांचा घोळ कसा …

मुंबई शहरासाठी एकूण १५ दिवसांपैकी प्रत्येक सणाकरीता वेगवेगळे दिवस निश्चित केले आहेत. त्यापैकी गणेश विसर्जनासाठी चार दिवस दिले आहेत. त्यात दीड दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी २८ ऑगस्ट, पाचव्या दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी १ सप्टेंबर, गौरी विसर्जनासाठी २ सप्टेंबर आणि अनंत चतुर्दशीसाठी ६ सप्टेंबर असे चार दिवस रात्री उशीरापर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र पाचवा दिवस हा १ सप्टेंबर नसून तो ३१ ऑगस्ट आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने काढलेल्या परिपत्रकात तारखेचा घोळ झाल्याची बाब गणेशोत्सव समितीने लक्षात आणून दिली आहे. तसेच याबाबत लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशीही मागणी समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी केली आहे. विशेष म्हणजे पाचव्या दिवशी जास्त गणेशमूर्तींचे विसर्जन होत असल्याने तारखेबाबत स्पष्टता केल्यास संभ्रम दूर होईल असेही त्यांनी म्हटले आहे.