लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी सलग दोन दिवस कामबंद आंदोलन सुरू आहे. दोन आगारातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बुधवारी सुरू केलेल्या आंदोलनात गुरुवारी सहा आगारातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. या आंदोलनाला व्यापक स्वरूप येत असून आंदोलनकर्ते मागण्यांवर ठाम आहेत. मात्र त्यामुळे ९२१ बस आगारातच उभ्या राहिल्या. परिणामी मुंबईकरांचे सलग दोन दिवस प्रचंड हाल झाले आहेत.

बेस्टचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये विलीन करा, बेस्ट प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी बेस्टचे सर्व बंद बसमार्ग पूर्ववत सुरु करा, बसगाड्यांची देखभाल-दुरुस्ती करूनच त्या मार्गस्थ करा, कर्मचाऱ्यांचा पगार वाढवा, अशा विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडले आहे.

आणखी वाचा- झोपुतील सदनिका जवळच्या नात्यातील व्यक्तीला हस्तांतरित करणे आता सोपे

बेस्टच्या ताफ्यात एकूण ३ हजार ८२ बस आहे. त्यापैकी १ हजार ६४२ बस पाच कंत्राटदाराद्वारे भाडेतत्वावरील आहेत. बेस्टच्या २७ आगारातून भाडेतत्वावरील बस धावतात. बेस्टने दररोज सुमारे ३१ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवासी संख्येच्या तुलनेत बसची संख्या कमी आहे. त्यातच सहा आगारातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

काम बंद आंदोलनामुळे वरळी, प्रतिक्षानगर, आणिक, धारावी, देवनार, शिवाजीनगर, घाटकोपर, मुलुंड, मजास, सांताक्रूझ, गोराई, मागाठाणे या आगारातील बस फेऱ्या प्रभावित झाल्या आहेत.

आणखी वाचा- निवासी डॉक्टरांच्या आत्महत्येप्रकरणी मार्डचे पंतप्रधानांना साकडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुरुवारी एसएमटी, मातेश्वरी आणि टाटा या बस पुरवठादार व्यवसाय संस्थेच्या कामगारांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे पहाटेपासून ते सकाळी ११.३० वाजेपर्यंत एकूण १ हजार ९ बस आगारातून सोडण्यात आल्या नाहीत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून बेस्ट उपक्रमातर्फे स्वतःच्या मालकीच्या जास्तीत जास्त बस गाड्या आगारातून सोडण्यात येत आहेत. बेस्ट उपक्रमाने या व्यवसाय संस्थांना तातडीने तोडगा काढण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या व्यवसाय संस्थेविरुद्ध कंत्राटांच्या अटी व शर्तीच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.