लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेतील आरे – बीकेसी या पहिल्या टप्प्याच्या संचलनासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (एमएमआरसी) नऊ मेट्रो गाड्यांची गरज आहे. आतापर्यंत आंध्र प्रदेशातील श्रीसिटीवरून आठ गाड्या मुंबईत दाखल झाल्या आहेत. आता केवळ एका गाडीची प्रतीक्षा असून ही गाडीही येत्या काही दिवसात आरे कारशेडमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

एमएमआरसीच्या माध्यमातून मेट्रो ३ चे काम सुरु आहे. ३३.५ किमीची ही मार्गिका दोन टप्प्यात वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. त्यानुसार बीकेसी ते आरे असा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ मध्ये तर बीकेसी ते कफ परेड असा दुसरा टप्पा जून २०२४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरसीचे नियोजन आहे. या पार्श्वभूमीवर एमएमआरसीने पहिल्या टप्प्याच्या बांधकामाला तसेच तांत्रिक कामाला वेग दिला आहे. तर दुसरीकडे मेट्रो गाड्या मुंबईत आणून त्यांची चाचणी घेण्याच्या कामालाही वेग देण्यात आला आहे. ३३.५ किमीच्या या मार्गिकेसाठी ३१ गाड्यांची आवश्यकता आहे. या गाड्यांची बांधणी आंध्र प्रदेशातील श्रीसिटी येथे एका खासगी कंपनीच्या माध्यमातुन केली जात आहे.

आणखी वाचा-नारळ विक्रेत्यांना गणेशोत्सव लाभदायी! पुणे-मुंबईत दररोज ७० ते ८० लाखांहून विक्री 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्याच्या संचलनासाठी एमएमआरसीला नऊ मेट्रो गाड्यांची आवश्यकता आहे. त्यानुसार आतापर्यंत बांधणी पूर्ण झालेल्या देशी बनावटीच्या, स्वयंचलित आठ गाड्या मुंबईत दाखल झाल्याची माहिती एमएमआरसीकडून देण्यात आली. पहिली गाडी ऑगस्ट २०२२ मध्ये मुंबईत दाखल झाली होती. तर आता सप्टेंबर २०२३ मध्ये आठवी गाडी मुंबईत आली आहे. आता एका गाडीची प्रतीक्षा असून ही प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे. त्याचवेळी या नव्या मेट्रो गाड्यांमधून तसेच भुयारी मेट्रो मार्गिकेवरून प्रवास करण्याची मुंबईकरांची प्रतीक्षाही येत्या तीन ते चार महिन्यात संपण्याची शक्यता आहे.