लोकसत्ता प्रतिनिधी मुंबई: डिझेल, कोळशावरील विजेचा वाढता वापर पर्यावरणासाठी धोकादायक असून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कमीत-कमीत इंधन आणि विजेचा वापर करण्याकडे मध्य रेल्वेचा कल आहे. विजेची गरज भागवण्यासाठी मध्य रेल्वे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करीत आहे. मोकळ्या आणि वापरात नसलेल्या २,६९४ किमी जागेवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पात निर्माण सौरऊर्जेचा वापर रेल्वे परिसरातील विजेचे दिवे, पंखे व इतर लहान उपकरणासाठी करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने २०३० पूर्वी 'निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक' बनण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यामुळे डिझेल लोको इंजिन कमी करून विद्युत लोको इंजिन वापरावर भर दिला जात आहे. मध्य रेल्वेच्या पाच विभागातील रेल्वे स्थानकांतील, रेल्वे कार्यशाळेतील विजेच्या वापरावरील खर्च कमी करण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. मध्य रेल्वेने ८१ ठिकाणी एक मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प विकसित करण्यासाठी कंत्राटे दिली आहेत. या प्रकल्पातून रेल्वेच्या सौरऊर्जा क्षमतेत आणखी वाढ होईल. हेही वाचा. मुंबई : रुग्णांचा मोफत एसटी प्रवास बंद याशिवाय मध्य रेल्वेने नागपूर विभागातील अजनी येथील नवीन इलेक्ट्रिक लोको शेडमध्ये एक मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने जून २०२३ पर्यंत सौरऊर्जेचे प्रकल्प उभारून शाश्वत उर्जेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. सौरऊर्जा आणि अक्षय ऊर्जेचा वापर वाढावा हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यामुळे कोळशापासून तयार होणाऱ्या विजेचा वापर कमी होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली. या विभागात सौरऊर्जा प्रकल्प सोलापूर विभाग उस्मानाबाद - २० किलोवॅट, बार्शी शहर - १५ किलोवॅट, वाडसिंगे - १० किलोवॅट, सलगरे - १५ किलोवॅट, पारेवाडी - १० किलोवॅट, मोहोळ - १० किलोवॅट, तिलाती - १० किलोवॅट नागपूर विभाग काला आखर - ५ किलोवॅट, पोला दगड - १० किलोवॅट, मरमझिरी - १० किलोवॅट, टाकू - किलोवॅट, जौलखेडा - ५ किलोवॅट ,दोडारामोहर - ५ किलोवॅट