मंगल हनवते
मुंबई : म्हाडाच्या ऑनलाइन भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे औरंगाबाद परीक्षा केंद्रावरील प्रकरणातून सिद्ध झाले आहे. आता या गैरप्रकाराची व्याप्ती वाढली असून टीसीएसच्या तपासणी अहवालानुसार तब्बल ६३ परीक्षार्थी संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या परीक्षार्थीचे छायाचित्र, परीक्षा केंद्रातील हालचाली संशयास्पद आढळल्याने म्हाडाने त्यांचा निकाल रोखून धरला आहे. पुढील आठवडय़ापासून म्हाडा या परीक्षार्थीची चौकशी सुरू करणार आहे. यात दोषी आढळणाऱ्याविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
डिसेंबरमध्ये होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे समोर आल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली. मात्र यानंतर टीसीएसच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा आरोप एमपीएससी समन्वय समितीने केला. मात्र हा आरोप म्हाडाने फेटाळून लावला होता. यानंतर समितीने औरंगाबादमधील एका परीक्षा केंद्रावरील सीसी टीव्ही कॅमेरात टिपलेले गैरप्रकाराचे चित्रण म्हाडाला दिले आणि टीसीएसने ते तपासले असता गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी चार जणांविरोधात औरंगाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर समितीने म्हाडाला ३६ जणांच्या नावाची यादी देऊन त्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. म्हाडाने या ३६ जणांबरोबर परीक्षेत अव्वल आलेल्या अंदाजे १६०० जणांच्या चौकशीचे आदेश दिले होते.
टीसीएसने चौकशी पूर्ण करून म्हाडाला अहवाल सादर केला असून या अहवालात ६३ परीक्षार्थीच्या हालचाली संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. यातील काही परीक्षार्थीची छायाचित्रे, बोटांचे ठसे जुळत नसल्याचे समोर आले आहे. तर काहींच्या परीक्षा केंद्रातील हालचाली संशयास्पद आहेत. काहींनी परीक्षा सुरू असताना काही यंत्रे वापरली असल्याचा संशय आहे. त्यामुळे या ६३ परीक्षार्थीचा निकाल रोखल्याची माहिती म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी दिली. या परीक्षार्थीची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता यांची म्हाडा चौकशी करणार असून दोषी आढळणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात अंदाजे १६०० जणांची तपासणी झाली आहे. टीसीएसकडून आणखी काही जणांची तपासणी सुरू आहे. टीसीएसच्या अहवालानुसार ६३ पैकी ३० परीक्षार्थी हे कनिष्ठ लपिक-टंकलेखक गटातील असून १६ सहायक स्थापत्य अभियंता गटातील आहेत. दोघे कनिष्ठ स्थापत्य अभियंता आणि तिघे साहाय्यक गटातील आहेत. उर्वरित परीक्षार्थी भूमापक, अणुरेखक, उपअभियंता स्थापत्य अशा गटातील आहेत.
परीक्षेत मोठा गैरप्रकार झाल्याचे सुरुवातीपासून सांगण्यात येत होते. पण म्हाडा ते काही मान्य करत नव्हते. आता मात्र आम्ही पुरावे दिल्यानंतर एक एक गैरप्रकार समोर येत आहेत. त्यामुळे तोतया उमेदवारांना रोखण्यासाठी आता मुख्य परीक्षा घेणे आवश्यक आहे. पण म्हाडा या मागणीकडे कानाडोळा करीत आहे. त्यामुळे आता गृहनिर्माणमंत्र्यांनी यात लक्ष घालावे आणि मुख्य परीक्षा घेण्यासंबंधी काही निर्णय घ्यावा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व सरकारी भरती परीक्षा एमपीएससीच्या माध्यमातूनच घ्याव्यात.
– राहुल कवठेकर, अध्यक्ष एमपीएससी समन्वय समिती
टीसीएसच्या अहवालानंतर एकही तोतया उमेदवार सेवेत दाखल होऊ नये यादृष्टीने आम्ही आवश्यक त्या सर्व गोष्टी करीत आहोत. संशयितांचा निकाल रोखला असून आता त्यांची पुन्हा चौकशी होणार आहे. दोषींविरोधात कडक कारवाईही केली जाणार आहे. एकाही प्रामाणिक परीक्षार्थीवर अन्याय होऊ देणार नाही, त्याचे नुकसान होऊ देणार नाही.
– राजकुमार सागर, सचिव म्हाडा