लवकरच राज्यातील मंत्रीमंडाला विस्तार होणार असल्याचे वृत्त आहे. राजकीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस सरकारने मंत्रीमंडळ विस्तारासाठी नवरात्रीचा मुहूर्त  पक्का केल्याचे समजतेय. लोकसभा आणि राज्यसभा निवडणुका आवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत त्यामुळे हा शेवटता मंत्रीमंडळ विस्तार असेल. या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये एकनाथ खडसे यांचे कमबॅक होणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे भाजपाचा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना मंत्री पदाची लॉटरी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारला ऑक्टोबरमध्ये चार वर्षे पूर्ण होत आहेत. लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्यासाठी अवघे पाच महिने उरले आहेत. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरमध्ये मुंबईत सुरू होणार आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी नवरात्रौत्सवाचा मुहूर्त शोधण्यात आल्याचे सांगण्यात येतेय.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या परदेशात आहेत. त्यांनीही मंत्रिमंडळ विस्ताराला होकार दिला आहे. ते मुंबईत परतल्यानंतर विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येते. या शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला खूष करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठरवले असल्याचेही बोलले जाते.

मंत्रिमंडळ विस्तारात तुमचा समावेश होईल का? असा प्रश्न जेव्हा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील विचारण्यात आला तेव्हा मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा विस्तार करतील असे खोचक उत्तर त्यांनी दिले. त्यांना लक्षात येईल राहू कोण, केतू कोण? हे त्यांच्या लक्षात येईल असेही त्यांनी म्हटले आहे. नाशिकमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. एवढंच नाही तर आमचं श्रद्धास्थान मातोश्री आहे. तिथून जो आदेश येतो तो आम्हाला मान्य असतो मंत्रिमंडळात काय मिळणार हे माहित नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यानंतर भाजपमध्ये पुन्हा एकदा मंत्रीमंडळाचा विषय ऐरणीवर आला असून लवकरच मंत्रीमंडळचा विस्तार होण्याची शक्याता आहे.  बुलडाणा जिल्हा व आसपासच्या भागातूनच पुढील मंत्री निवडला जाऊ शकतो. खाते कोणते हा विषय वेगळा राहील. पण रिक्त जागा भरताना बुम्लढाणा किंवा आसपासच्या जिल्ह्य़ाचा प्राधान्याने विचार होईल, असे समजते.