शेतकरी आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी आज ‘कृष्णकुंज’वर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकरी आंदोलनाचं नेतृत्त्व करावं, अशी विनंती या शेतकऱ्यांनी आज राज ठाकरेंना केली आहे. त्यामुळे आता राज ठाकरे शेतकरी संपात उडी घेण्याची शक्यता आहे. तसंच ते पुणतांब्याला जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथाही जाणून घेऊ शकतात. शेतकऱ्यांनी आज आपल्या समस्या राज ठाकरे यांना सांगितल्या. राज ठाकरे जे काम हाती घेतात ते पूर्ण करून दाखवतात. ते आम्हाला न्याय मिळवून देऊ शकतात, असा विश्वास आम्हाला वाटतोय असंही या शेतकऱ्यांनी म्हटलंय.

राज ठाकरे यांनी पुणतांब्यात जाऊन  शेतकऱ्यांची भेट घेतली तरीही आंदोलनाचं नेतृत्त्व शेतकरीच करतील असं बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलं आहे. आज झालेल्या बैठकीत मनसे नेते बाळा  नांदगावकर, अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, तसंच पुणतांब्यातले शेतकरी मुरलीधर थोरात, बबनराव धकटे, शांतीलाल भाटी, राजेश लुटे आणि गणेश जाधव यांचा समावेश होता. बाळा नांदगावकर यांनी काही दिवसांपूर्वीच पुणतांब्यात जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या.आता राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसेही सरकारविरोधात आक्रमक होणार हे स्पष्ट आहे.

शिवसेनेबाबत शेतकऱ्यांना विचारलं असता शिवसेना हा पक्ष आमच्यासाठी मगरीचे अश्रू ढाळत असल्याची प्रतिक्रिया पीडित शेतकऱ्यांनी दिली आहे. इतकंच नाही तर सत्तेत राहून ते आम्हाला कसा न्याय मिळवून देणार? असाही प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला आहे. आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठी कर्जमाफी देणार असल्याची घोषणा केली. ज्यानंतर लगेचच त्यांनी शेतकरी संपात राजकीय पक्ष पोळी भाजून घेताना दिसत आहेत, असा आरोपही केला. हे सगळं असलं तरीही पुणतांब्यातल्या शेतकऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांना या संपाचं नेतृत्त्व करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे संपात विरोधकाच्या रूपानं का होईना राज ठाकरेंची भर पडली आहे हे निश्चित. आता राज ठाकरे शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहून नेमकी कोणती मागणी लावून धरणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.